ही योजना बंद करण्यामागचं कारण, नव्या योजनेत काय बदल आहेत आणि शेतकऱ्यांना याचा फायदा कसा मिळणार, याविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे.
का बंद झाली 1 रुपयात पीक विमा योजना?
2016 पासून महाराष्ट्रात ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ सुरू आहे. 2023 मध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात या योजनेत सहभागी होण्याची सुविधा दिली होती. मात्र ही योजना बंद करण्यामागे बोगस अर्जांची संख्या आणि घोटाळे हे प्रमुख कारण ठरले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात सांगितले की, “1रुपयात विमा मिळू लागल्यावर लाखो खोटे अर्ज आले, बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी, मंदिर, गायरान आणि पडीक जमिनीवर शेती दाखवून विमा घेतला गेला. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा अपव्यय झाला. गरजूंना लाभ मिळत नव्हता. यामुळेच ही योजना नव्या स्वरूपात आणली जात आहे.”
नव्या योजनेत काय आहेत २ मोठे बदल?
1) शेतकऱ्यांना आता अधिक पैसे भरावे लागणार आहे.आधी 1 रुपयात शेतकरी योजना घेऊ शकत होते. आता मात्र पुन्हा पूर्वीप्रमाणे विम्याचा हप्ता भरावा लागेल. जसे की,
खरीप हंगामासाठी: संरक्षित रकमेच्या 2%
रब्बी हंगामासाठी: संरक्षित रकमेच्या 1.5%
नगदी पिकांसाठी (दोन्ही हंगामात): संरक्षित रकमेच्या 5%
उदारणार्थ, जर तुम्ही 1 हेक्टर सोयाबीन पिकासाठी विमा घ्यायचा आहे आणि विमा संरक्षण 35,000 प्रति हेक्टर आहे, तर शेतकऱ्याला त्याच्या 2% म्हणजे 700 रु भरावे लागतील.
2) भरपाई मिळणार केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित
पूर्वी 1 रुपयात विमा योजनेअंतर्गत भरपाई 4 कारणांवर (ट्रिगर) आधारित दिली जात होती:
स्थानिक नैसर्गिक आपत्ती
हंगामातील प्रतिकूल स्थिती
काढणीनंतरचे नुकसान
पीक कापणी प्रयोग
नव्या योजनेत फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई दिली जाईल. म्हणजेच, एखाद्या महसूल मंडळात नुकसान झाले, तर त्या संपूर्ण मंडळातील शेतकऱ्यांना सारखी भरपाई मिळेल.
कोणत्या नुकसानावर भरपाई मिळणार?
नव्या सुधारित योजनेत, पेरणीनंतर ते कापणीपर्यंतच्या कालावधीत निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींच्या जोखमीवर विमा लाभ मिळेल. यामध्ये वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, नैसर्गिक आग, पूर, जलमय होणे, भूस्खलन,अतिवृष्टी, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग
दरम्यान, राज्य सरकारनं आता विमा कंपन्यांऐवजी थेट शेतकऱ्यांना लाभ मिळेल, यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. 1 रुपयात विमा योजना थांबली असली, तरी नव्या पद्धतीत पारदर्शकता आणि अचूक भरपाई देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Mumbai,Maharashtra
पीक विम्यातील नवीन 2 बदल कोणते? शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी दिली जाणार? जाणून घ्या