Last Updated:
Agriculture News : हवामान बदल आणि पावसातील अनिश्चिततेचा सामना करत असलेल्या कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी एक आशादायक बातमी समोर आली आहे.
मुंबई : हवामान बदल आणि पावसातील अनिश्चिततेचा सामना करत असलेल्या कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी एक आशादायक बातमी समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील पैलपाडा येथील राज्य बियाणे महामंडळाच्या संशोधन केंद्रात विकसित करण्यात आलेले ‘महाबीटी बीजी-2’ हे नवीन संकरित बीटी कापूस वाण आता शेतकऱ्यांच्या सेवेत उपलब्ध झाले आहे.
महाबीज-124 चे वैशिष्ट्ये काय?
राज्य बियाणे महामंडळाच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ या प्रगत संशोधन केंद्रात तयार करण्यात आलेल्या या वाणाचे अधिकृत अनावरण नुकतेच शनिवारी करण्यात आले. ‘महाबीज-124’ या नावाने बाजारात उपलब्ध होणारे हे संकरित वाण विशेषतः कोरडवाहू भागांतील शेतकऱ्यांना लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांनी या वाणाबाबत बोलताना सांगितले की, “हे वाण कमी पावसातही अधिक उत्पादन देणारे असून, ते शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल.”
पारंपरिक वाणांपेक्षा अधिक नफा
या वाणाची सर्वात मोठी खासियत म्हणजे ते पारंपरिक कापूस वाणांपेक्षा अधिक उत्पादनक्षम असून, कमी पाण्यातही भरघोस उत्पन्न देऊ शकते. कोरडवाहू शेतकऱ्यांना दरवर्षी हवामानाच्या बदलत्या स्थितीचा फटका बसतो, अशावेळी हे वाण त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते. हे वाण शाश्वत शेतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
तूर शेतीसाठीही नवीन पर्याय
या कार्यक्रमात केवळ कापसाचेच नाही, तर संशोधित तूर वाण ‘एमपीव्ही-106’ देखील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले. या वाणाला तामिळनाडू आणि कर्नाटकसारख्या राज्यांमधून भरघोस प्रतिसाद मिळत असून, लवकरच या भागांतही त्याचा पुरवठा सुरू होणार आहे. हे वाण अधिक उत्पादनक्षम असून, बदलत्या हवामानातही चांगले उत्पादन देण्यास सक्षम आहे.
शाश्वत शेतीसाठी सातत्यपूर्ण संशोधन
या वेळी डॉ. रणजीत सपकाळ (महाव्यवस्थापक) आणि विजय देशमुख यांनी सांगितले की, “राज्याच्या विविध भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन बियाण्यांचे संशोधन व उत्पादन करण्यात येते. केवळ कापूसच नव्हे, तर इतर पिकांसाठीही ही प्रक्रिया सातत्याने सुरु आहे. हे सर्व प्रयत्न शाश्वत शेतीसाठी चालवले जात आहेत.”
महाबीज केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन
नवीन वाणांची अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि खरेदीसाठी शेतकऱ्यांनी जवळच्या महाबीज विक्री केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे. या नव्या वाणांच्या वापरामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य बळकट होणार आहे.
Mumbai,Maharashtra