मान्सूनचा अर्धवट प्रवास
सध्या मान्सून खान्देश, उत्तर नाशिक आणि विदर्भाच्या उर्वरित भागात पोहोचलेला नाही. हवामान खात्याच्या माहितीनुसार, सध्या या भागांमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी आवश्यक असलेली अनुकूल वातावरणीय स्थिती नाही. त्यामुळे राज्याच्या मध्य आणि उत्तर भागांतील शेतकरी मोठ्या प्रमाणावर मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक भागांत शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत पूर्ण केली असून, पेरणीसाठी फक्त नियमित पावसाची प्रतीक्षा सुरु आहे.
हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 9 जून रोजी मुंबईसह कोकणातील सात जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. मात्र, 10 ते 12 जून दरम्यान पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर 13 जूनपासून मान्सून महाराष्ट्रात पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज आहे. या कालावधीत मृग नक्षत्राचा प्रारंभ होणार असल्याने हवामानशास्त्रज्ञ मानतात की, या काळात मान्सून पुढे सरकण्यास पोषक स्थिती निर्माण होईल.
शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली
मान्सूनच्या या अनिश्चित प्रवासामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. काही भागांत पेरणीची तयारी अंतिम टप्प्यात आहे, तर काही ठिकाणी सुरुवातही झाली आहे. मात्र, पावसाच्या अनियमिततेमुळे बियाण्यांची नासधूस, आणि आर्थिक नुकसान याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. राज्यातील कृषी विभागही या परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहे.
इतिहास घडवणारा मे महिना
या वर्षीचा मे महिना पावसाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरला. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, 124 वर्षांतील सर्वाधिक पाऊस या मे महिन्यात नोंदवला गेला. यंदा मे महिन्यात सरासरी 126.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईसह कोकण आणि मध्य भारतात या दरम्यान दमदार पावसाचा अनुभव आला होता.
विदर्भातही पावसाचा जोर
बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या भागातही विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Mumbai,Maharashtra
June 09, 2025 9:25 AM IST
शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! या तारखेपासून पुन्हा पाऊस झोडपणार, नदी नाले वाहणार, या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका