Last Updated:
Agriculture News : राज्यातील शेती अधिक फायद्याची व्हावी, उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी येत्या पाच वर्षांत दरवर्षी 5 हजार कोटी, एकूण 25 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
पंढरपूर : राज्यातील शेती अधिक फायद्याची व्हावी, उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी येत्या पाच वर्षांत दरवर्षी 5 हजार कोटी, एकूण 25 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरमध्ये दिली आहे. ठिबक संच, कृषी यांत्रिकीकरण, शेततळे, सिंचनासाठी पंप अशा योजनांचा या निधीतून समावेश असणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शनिवारी सायंकाळी ‘कृषी पंढरी’ या भव्य कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करता यावा, म्हणून राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना बाजारपेठांशी थेट जोडणाऱ्या योजनाही बाजार समित्यांच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. त्यामुळे शेतमालाला योग्य भाव मिळण्यास मदत होत आहे. गावातील विकास सहकारी संस्थांना बहुउद्देशीय संस्थांमध्ये रूपांतरित करण्याची योजना केंद्र सरकारने तयार केली आहे. या संस्थांना एकूण 18 प्रकारच्या व्यवसायांची परवानगी दिली जाणार असून त्या शेतकरी आणि बाजारपेठ यांच्यात महत्त्वाचा दुवा ठरणार आहेत. मालाचे साठवण, कोल्ड स्टोअरेजची सुविधा, वितरण व्यवस्था मजबूत करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
फडणवीस पुढे म्हणाले की, राज्य सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प केला असून शेतीतील यांत्रिकीकरण, पाणी व्यवस्थापन, प्रक्रिया उद्योग आणि थेट विक्री व्यवस्था यावर भर दिला जाणार आहे. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची आणि योजनांची माहिती मिळेल. त्यामुळे शेतीतील उत्पादनक्षमतेत मोठी वाढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनीही राज्य सरकारच्या कृषी योजनांबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा उपयोग करून शेतीत आधुनिक तंत्रज्ञान रुजवण्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ‘एआय’च्या सहाय्याने हवामान अंदाज, कीड व्यवस्थापन आणि उत्पादन वाढविण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी उत्कृष्ट शेती करतात, मोठ्या प्रमाणावर केळीची निर्यातही केली जाते. मात्र डाळिंब आणि इतर फळबागांना माशीमुळे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या संकटावर मात करण्यासाठी बॅगेज, ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर अशा योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री कोकाटे यांनी केले.
Mumbai,Maharashtra
July 06, 2025 9:42 AM IST
पंढरपूरमधून शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा! वाचा सविस्तर