Last Updated:
Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाने (IMD) 15 जुलैसाठी राज्यभरात विविध भागांतील हवामानाबाबत महत्त्वाचा अंदाज जाहीर केला आहे.
मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) 15 जुलैसाठी राज्यभरात विविध भागांतील हवामानाबाबत महत्त्वाचा अंदाज जाहीर केला आहे. यानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने या भागात येलो अलर्ट जाहीर केला असून काही ठिकाणी चक्री वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. नद्या, नाल्यांच्या पातळीत वाढ होऊ शकते. किनारपट्टी भागात रहिवाशांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे शहरात काही सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिकमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. पावसामुळे वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका आहे. शेतकऱ्यांनी आपली पिकं सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे.
औरंगाबाद, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह होण्याची शक्यता आहे. ढगांच्या उपस्थितीमुळे दिवसभर हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. जरी अतिवृष्टीचा धोका नसला तरीही विजेच्या कडकडाटामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, वादळी वाऱ्यांपासून फळबागा आणि पीकांचे संरक्षण करावे, असे हवामान विभागाचे सांगणे आहे.
विदर्भातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. विशेषतः नागपूर व गोंदियामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या भागांमध्ये रेड किंवा येलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. चंद्रपूर व अमरावतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.
पावसामुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव करण्यासाठी पाण्याचा निचरा होईल याची योग्य व्यवस्था करावी. जुलैमध्ये पावसाची स्थिती हळूहळू सुधारत असल्यामुळे पेरणीची घाई करू नये, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात. वादळी वाऱ्यांमुळे झाडे पडण्याचा धोका संभवतो. फळबागा, शेतातील झाडे यांचे योग्य संरक्षण करावे.
राज्यात पावसाची स्थिती हळूहळू सक्रिय होत असली तरी काही भागांमध्ये अतिवृष्टीचा धोका असल्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. हवामान खात्याच्या पुढील सूचनांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Mumbai,Maharashtra
July 15, 2025 8:32 AM IST
कृषी हवामान : पावसाचा जोर वाढणार! पूर परिस्थितीची शक्यता, या जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट जाहीर