Last Updated:
Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांवरील कर्जबाजारीपणाचा आणि आर्थिक संकटाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे एका कर्जबाजारी शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शेतकऱ्यांवरील कर्जबाजारीपणाचा आणि आर्थिक संकटाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे एका कर्जबाजारी शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत शेतकऱ्याचे नाव प्रताप भिकनराव आमटे (वय 46, रा. देऊळगाव बाजार, ता. सिल्लोड) असे आहे. या घटनेची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.
काय घडले नेमके?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप आमटे हे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी आपल्या शेतात गेले होते.मात्र, त्या दिवशी त्यांच्या मनात काय घडत होते, हे कोणीच ओळखू शकले नाही. शेतामध्ये एकटे असतानाच त्यांनी झाडाला दोरी बांधून गळफास घेतला. काही वेळानंतर शेजारील शेतकरी शेताकडे गेले असता ही धक्कादायक घटना त्यांच्या निदर्शनास आली.
तेव्हा त्यांनी तातडीने स्थानिक नागरिकांची मदत घेतली व आमटे यांना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
2024 मध्ये हजारो शेतकऱ्यांनी संपवले जीवन
ही घटना एकटीच नाही. राज्यातील शेतकऱ्यांची आत्महत्या ही आता एक गंभीर सामाजिक संकट बनली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील) यांनी यापूर्वी विधानसभेत माहिती दिली होती की, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत फक्त विदर्भ आणि मराठवाडा विभागात 2,706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
यामध्ये अमरावती विभागात 1,069 आणि छत्रपती संभाजीनगर विभागात 952 शेतकऱ्यांनी हवामान बदल, ओला व कोरडा दुष्काळ, पीकनुकसानीमुळे निर्माण झालेला आर्थिक ताण आणि कर्जबाजारीपणा यामुळे आयुष्य संपवले.
Aurangabad,Maharashtra
आत्महत्येची मालिका थांबेना! कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपवलं जीवन