Last Updated:
अद्रक पिकाला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी याही वर्षी अद्रक पिकाची लागवड केली. मात्र, शेतकऱ्यांना यावर्षी त्यातून जेमतेम उत्पन्न मिळाले आहे. त्याचबरोबर शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांची चिंता दुपटीने वाढलेली आहे.
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील शेतकरी जास्तीत जास्त संत्रा, कपाशी, तूर, सोयाबीन याच पिकाची लागवड करतात. पण, गेल्या काही वर्षांत मोजके शेतकरी अद्रक पिकाची सुद्धा लागवड करत आहेत. मागील वर्षी अद्रक पिकाला चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी याही वर्षी अद्रक पिकाची लागवड केली. मात्र, शेतकऱ्यांना यावर्षी त्यातून जेमतेम उत्पन्न मिळाले आहे. त्याचबरोबर शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांची चिंता दुपटीने वाढलेली आहे. इतकी मेहनत घेऊन जर हाती धुपाटणे येत असेल तर शेतकऱ्यांनी करायचे काय? असे म्हणत अमरावतीमधील अद्रक उत्पादक शेतकरी संतापले आहे.
अमरावतीमधील काजळी येथील सधन शेतकरी मयुर देशमुख यांनी अद्रक उत्पादनाबाबत लोकल 18 सोबत चर्चा केली. तेव्हा ते सांगतात की, सरकार फक्त शेतकऱ्यांची थट्टा करत आहे. यावर्षी अद्रक उत्पादक शेतकरी हतबल झाले आहे. कारण लागवड खर्च हा अर्धा एकर शेतीला 1 लाख रुपये येतो. अद्रकाला भाव आहे 30 रुपये किलो. याचा हिशोब काढला तर माझ्या उत्पादनानुसार फक्त 50 हजार रुपये हाती येईल. इतके नुकसान शेतकऱ्यांचे होत आहे.
अद्रकच नाही तर शेतकऱ्याच्या कोणत्याच भाजीपाल्याला भाव नाही. काही पिकं ही ऑप्शन म्हणून सुद्धा असतात. एका पिकात तोटा झाला तर तो दुसऱ्या पिकांत भरून निघेल. पण, यावर्षी शेतमालाला भाव नसल्याने आमचे सर्व उपाय हे हरलेले आहे. शासन शेतकऱ्याला खोटी आशा देतात. कर्जमाफी देणार म्हणून सांगितलं होतं पण अजूनही त्याबाबत काहीच माहिती आलेली नाही. शेतकऱ्यांनी नेमकं करावं तरी काय? हा प्रश्न आता सर्व शेतकऱ्याला पडला आहे.
पावसाळा सुरू झाला की, आम्हाला आणखी जमिनी तयार कराव्या लागतात. त्याला सुद्धा खर्च हा येणारच आहे. तो आणायचा कुठून? अद्रक हे पिकं चांगला नफा मिळवून देणारं पिकं आहे. त्यामुळे लागवड केली होती. पण, यावर्षी त्यातही निराशा आली. सरकार शेतकऱ्यांची थट्टा करणं कधी बंद करणार? की शेतकरी दरवर्षी काही न काही धक्का खावून असाच हतबल होणार? हा प्रश्न मला पडलेला आहे? असे मयुर देशमुख सांगतात.
Amravati,Maharashtra
April 14, 2025 1:54 PM IST