Last Updated:
Agriculture News : खरीप हंगाम 2025 साठी शेतकऱ्यांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी सोयगाव (छत्रपती संभाजीनगर) येथील तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कार्यालयात कृषी विभागातर्फे स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
छ. संभाजीनगर : खरीप हंगाम 2025 साठी शेतकऱ्यांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी सोयगाव (छत्रपती संभाजीनगर) येथील तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कार्यालयात कृषी विभागातर्फे स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकरी सध्या शेतीची तयारी करत आहेत. त्यामध्ये शेतातील जुनी पिके व तण काढणे, नांगरणी करून जमीन तयार करणे, आणि पावसाआधी चर खोदणे आदी कामे गतीने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभागानेही तयारीचा आढावा घेतला आहे.
खरीप 2025 मध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे, खते आणि कीटकनाशके योग्य दराने मिळावीत व फसवणुकीपासून त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी कृषी निविष्ठा केंद्रांची नियमित तपासणी सुरू आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या समस्या आणि तक्रारी तातडीने सोडवण्यासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांनी दिली.
या तक्रार निवारण केंद्रामध्ये खते, बियाणे आदींसंबंधी तक्रारी लेखी स्वरूपात करता येणार आहेत. तक्रार करताना शेतकऱ्यांनी खरेदी पावती, सातबारा, होल्डिंग प्रमाणपत्र अशा आवश्यक कागदपत्रांची जोड करावी. तक्रार अर्जात शेतकऱ्याचे नाव, पत्ता, गाव, तालुका व भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे. हे अर्ज तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समिती कृषी कार्यालयात सादर करता येतील.
शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा खरेदी करताना नेहमी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, तसेच पक्की पावती घ्यावी. पावतीवर बियाण्याचा लॉट नंबर, उत्पादन दिनांक व इतर आवश्यक तपशील तपासावा. फक्त नोंदणीकृत व लेबल क्लेम असलेली निविष्ठा खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
दरम्यान, काही विक्रेते बी-बियाणे आणि खते कृत्रिमरीत्या टंचाई निर्माण करून त्यांची चढ्या भावाने विक्री करतात. अशा बाबतीत संबंधित विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही कृषी विभागाने दिला आहे. अशा फसवणुकीचा बळी पडलेल्या शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केल्यास तातडीने चौकशी करून उपाययोजना केली जाईल.या उपक्रमामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना अधिक सुलभ सेवा व संरक्षण मिळण्यास मदत होणार आहे.
Aurangabad,Maharashtra
खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून नवीन कक्षाची स्थापना! शेतकऱ्यांना काय फायदा होणार?