Last Updated:
Agriculture News : बहुतांश लोक मालमत्तेबाबत वारसा आणि वडिलोपार्जित संपत्ती या संकल्पनांना एकाच प्रकारात गृहित धरतात. मात्र, कायद्याच्या दृष्टीने दोघांमध्ये मूलभूत फरक आहे.
मुंबई : बहुतांश लोक मालमत्तेबाबत वारसा आणि वडिलोपार्जित संपत्ती या संकल्पनांना एकाच प्रकारात गृहित धरतात. मात्र, कायद्याच्या दृष्टीने दोघांमध्ये मूलभूत फरक आहे. तुमच्याकडे जर मालमत्ता आजी-आजोबांकडून किंवा इतर नातेवाईकांकडून आली असेल, तर ती संपत्ती ‘वारशाने मिळालेली’ म्हणून ओळखली जाते. परंतु, वडील, आजोबा किंवा पणजोबांकडून मिळालेली मालमत्ता ही ‘वडिलोपार्जित’ संपत्तीच्या श्रेणीत येते.
वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे काय?
कोणतीही संपत्ती जी पूर्वजांकडून पुढील पिढीकडे आली आहे आणि अद्याप विभाजित झालेली नाही, ती वडिलोपार्जित मानली जाते. विशेष म्हणजे, अशा मालमत्तेवर मुलांचा जन्मतःच हक्क निर्माण होतो. तुम्हाला ही मालमत्ता तुमच्या वडिलांकडून, त्यांच्या वडिलांकडून किंवा त्यांच्याही पूर्वजांकडून मिळालेली असते, तेव्हा ती ‘वडिलोपार्जित’ ठरते.
वारशाने मिळालेली संपत्ती कशी वेगळी?
आई, मामा, आजी किंवा इतर कोणत्याही नातेवाईकांनी मृत्यूनंतर आपली मालमत्ता तुम्हाला दिल्यास ती ‘वारसा हक्काने मिळालेली’ संपत्ती मानली जाते. यात तुम्हाला जन्मतः हक्क मिळत नाही, तर मालमत्ताधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेनुसार किंवा कायद्याने तुम्ही त्या संपत्तीचे वारसदार ठरता.
काय बेदखल केले जाऊ शकते?
जर संपत्ती वडील वा आईने स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी केली असेल, तर ती ‘स्वकष्टाची संपत्ती’ मानली जाते. अशा संपत्तीतून ते आपल्या मुलाला बेदखल करू शकतात. मात्र, वडिलोपार्जित मालमत्तेतून एखाद्या वारसाला बेदखल करणे सहज शक्य नाही. काही विशेष कायदेशीर कारणांअंतीच हे शक्य होते. आणि न्यायालय त्यावर अंतिम निर्णय देते.
कायदेशीर कालमर्यादा व दावा
वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा दाखल करण्यासाठी 12 वर्षांची कालमर्यादा ठरवण्यात आली आहे. मात्र,विशिष्ट परिस्थितीत न्यायालय ही मर्यादा ओलांडूनही दावा मान्य करू शकते.यासाठी ठोस पुरावे आणि कारणे सादर करणे आवश्यक असते.
वडिलोपार्जित दर्जा किती काळ राहतो?
चार पिढ्यांपर्यंत ही मालमत्ता वडिलोपार्जित समजली जाते. पणजोबा, आजोबा, वडील आणि त्यांच्या मुले. मात्र, यामधील कोणीही संपत्तीचे विभाजन केल्यास ती मालमत्ता वैयक्तिक स्वरूपाची होते आणि वडिलोपार्जित दर्जा संपुष्टात येतो.
Mumbai,Maharashtra
June 09, 2025 1:06 PM IST
वडिलोपार्जित जमीन, मालमत्तेवर किती पिढ्यांचा हक्क असतो? कायदा काय सांगतो?