Last Updated:
उन्हाळाच्या दिवसांत पिकांबरोबर फळझाडांची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी योग्य नियोजनाची गरज आहे.
सोलापूर : मागच्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी उन्हाच्या झळा तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे, पारा 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. दरम्यान उन्हाळाच्या दिवसांत पिकांबरोबर फळझाडांची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी योग्य नियोजनाची गरज आहे. उन्हाळ्यात पिकांचे संरक्षण कसा करावे? काय उपाययोजना कराव्यात? या संदर्भात अधिक माहिती कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख लालासाहेब कांबळे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली आहे.
उन्हाळ्यात अशी घ्यावी फळबागेची काळजी
कडक उन्हाळ्यात आंबा, चिकू, संत्रा कलमे वाचवण्यासाठी कलमांच्या जोडावर शेवाळ ओले करून बांधावे. ते दर तिसर्या दिवशी ओले करावे. त्यामुळे कलम वाळण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. फवारा सिंचन पद्धतीत पाण्याचा वापर काटकसरीने होतो, मात्र भांडवली खर्च जास्त येतो. म्हणून सहकारी तत्त्वावर किंवा भाडेपद्धतीने ही सामग्री वापरणे सोईचे होईल. ठिबक पद्धत ही एक आधुनिक व अतिशय काटकसरीने पाणी वापरण्याची पद्धत आहे. यात थेंब थेंब पाणी देण्याची सोय असते. उन्हाळ्याच्या दिवसात फळझाडांसाठी याचा वापर केल्यास उपलब्ध पाण्याचा योग्य वापर होईलच, शिवाय कमी पाण्यात मोठी जमीन ओलिताखाली आणता येईल.
गरम झळांपासून बागेचा बचाव व्हावा म्हणून बागेच्या सभोवार निलगिरी, मलबेरी, शेवरी, शिकेकाई, सुबाभूळ, प्रोसोफीस, नीम, चिंच, शेवगा, पांगारा या वारा प्रतिबंध झाडांची रांग वा पट्टा लावणे फायद्याचे ठरते. उन्हाळ्यामध्ये फळबागांमध्ये सूक्ष्म सिंचन पद्धती, आच्छादन, बाष्परोधकांचा वापर करणे आवश्यक आहे. जेणेकरून वाढत्या तापमानाचा विपरित परिणाम फळझाडांवर होणार नाही.
कडक उन्हापासून नवीन लागवड केलेल्या फळझाडांच्या रोपांचे संरक्षण करण्यासाठी पहिली 1 ते 2 वर्ष रोपांवर सावली करावी. त्यासाठी रोपाच्या दोन्ही बाजूंना 3 फूट लांबीचे बांबू रोवावेत. या बाबूंना चारही बाजूंनी व मधून तिरकस असे बांबू किंवा कामट्या बांधून त्यावर वाळलेले गवत अंथरावे. या गवतावरून तिरकस काड्या सुतळीने व्यवस्थित बांध्याव्यात. वाळलेल्या गवता ऐवजी बारदाना किंवा शेडनेटचा वापर करावा.
Solapur,Maharashtra
April 24, 2025 6:52 PM IST
Fruit Crops : ऊन जरा जास्तय, शेतकऱ्यांनो कशी घ्याल फळबागेची काळजी? कृषी तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला