कुळांचे प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्ये
महाराष्ट्रातील कायद्यानुसार, कुळांना खालील तीन प्रकारांमध्ये विभागले गेले आहे:
कायदेशीर कुळ
संरक्षित कुळ
कायम कुळ
कायदेशीर कुळ म्हणजे काय?
महाराष्ट्र कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 2011 च्या कलम 4 अंतर्गत, पुढील निकष पूर्ण करणारी व्यक्ती कायदेशीर कुळ म्हणून ओळखली जाते:
शेतकऱ्याने जमीन मालकाच्या संमतीने शेती करण्याचा करार केलेला असावा.
संबंधित व्यक्ती स्वतः त्या जमिनीची कसणारी असावी आणि नियमित भाडे (खंड) भरत असावी.
तो व्यक्ती जमीन मालकाच्या कुटुंबाचा सदस्य नसावा.
तो पगारावर काम करणारा नोकर नसावा किंवा जमीन मालकाच्या थेट नियंत्रणाखाली शेती करत नसावा.
संरक्षित कुळ म्हणजे कोण?
1939 मध्ये लागू झालेल्या कायद्यानुसार, पुढील गटातील शेतकऱ्यांना संरक्षित कुळ म्हणून गणले गेले:
1 जानेवारी 1938 पूर्वी सलग 6 वर्षे शेती करणारे शेतकरी.
1 जानेवारी 1945 पूर्वी सलग 6 वर्षे शेती करणारे शेतकरी.
1 नोव्हेंबर 1947 रोजी शेती करत असलेले शेतकरी.
या व्यक्तींची नोंद सातबाऱ्यावरील ‘इतर हक्क’ या विभागात ‘संरक्षित कुळ’ म्हणून केली जाते.
कायम कुळ कोणाला म्हणतात?
1955 मध्ये सुधारित कायद्यानुसार, खालील व्यक्तींना कायम कुळ म्हणून मान्यता दिली जाते:
ज्यांना रूढी, परंपरा किंवा न्यायालयीन निकालाद्वारे कायमस्वरूपी कुळ म्हणून ओळखले गेले आहे.अशा शेतकऱ्यांची नोंद सातबाऱ्यावर ‘कायम कुळ’ या हक्काखाली होते.
कुळाची जमीन वर्ग-1 मध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया
जर कुळाच्या मालकीची जमीन वर्ग-2 वरून वर्ग-1 मध्ये रूपांतरित करायची असेल, तर संबंधित शेतकऱ्याने तहसील कार्यालयात अर्ज दाखल करणे आवश्यक असते. या प्रक्रियेसाठी तहसीलदार अधिकृत अधिकारी म्हणून कार्य करतात.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:
1960 पासूनचे सातबारा उतारे
फेरफाराची संपूर्ण नोंद
खसरा पत्रक
कुळ प्रमाणपत्र
कुळाचा चलन दस्तऐवज
फेरफाराशी संबंधित अन्य दस्तऐवज
जमिनीच्या वर्ग-1 मध्ये रूपांतराची प्रक्रिया कशी होते?
तहसील कार्यालय संबंधित व्यक्तीचा अर्ज स्वीकारते. तलाठी आणि मंडळ अधिकारी जमिनीची तपासणी करून अहवाल तयार करतात.सार्वजनिक नोटीस जारी करून, अन्य कोणताही आक्षेप आहे का, याची पडताळणी केली जाते.सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एका महिन्याच्या आत सातबाऱ्यावर ‘वर्ग-1’ अशी अधिकृत नोंद केली जाते.
कुळ कायद्याचा इतिहास आणि प्रवास
हा कायदा प्रथम 1939 साली अस्तित्वात आला, ज्यामध्ये शेतजमिनीवर हक्क असलेल्या व्यक्तींची अधिकृत नोंद सातबाऱ्यावर करण्यात आली. नंतर, 1948 मध्ये ‘मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम’ लागू करण्यात आला. पुढे 2012 मध्ये या कायद्यात सुधारणा करून त्याचे नाव ‘महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम’ ठेवण्यात आले.
Mumbai,Maharashtra
May 04, 2025 11:43 AM IST
Agriculture Land : जमीन वर्ग -2 चे रूपांतर वर्ग-1 मध्ये कसं करायचे? समजून घ्या संपूर्ण प्रक्रिया