अफगाणिस्तान हा भारतासाठी एक प्रमुख सुका मेवा पुरवठादार देश आहे. दरवर्षी सुमारे 20 हजार टन सुका मेवा भारतात अफगाणिस्तानमधून निर्यात केला जातो. यामध्ये प्रामुख्याने जर्दाळू, बदाम (विशेषतः मामरा बदाम), काळे व हिरवे मनुके, पिस्ते, अक्रोड आणि सुके अंजीर यांचा समावेश होतो. सध्या अमेरिकेतून येणारी काही उत्पादने दुबईमार्गे भारतात पोहोचतात. मात्र भारत-पाकिस्तान संबंध तणावपूर्ण झाल्यामुळे अफगाणिस्तानातूनही दुबईमार्गे आयात करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे वाहतूक खर्च लक्षणीय वाढणार आहे.
काबूलहून थेट विमानसेवेने येणाऱ्या मालाचा पुरवठा अडथळ्यांना सामोरा जात आहे. परिणामी अंजीर आणि मनुक्यासारख्या औषधी उपयोगी सुक्या मेव्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अटारी सीमेवर मालवाहतूक थांबली असून, सध्या सुमारे ३० ट्रक सीमा ओलांडण्याची वाट पाहत थांबले आहेत.
सध्या देशात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे सुक्या मेव्याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. साठा तात्पुरता पुरेसा असला तरी, जुलै-ऑगस्ट दरम्यान नवीन माल बाजारात येईपर्यंत मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. परिणामी सणासुदीच्या काळात सुक्या मेव्याच्या किंमती झपाट्याने वाढू शकतात.
सध्याचे आयातीचे दर (प्रति किलो)
मामरा बदाम – 2,000 रु ते 2,500 रु
पिशोरी पिस्ता – 3,000 रु ते 3,500 रु
सुके अंजीर – 600 रु ते 1,400 रु
काळे मनुके – 200 रु ते 350 रु
सध्या सुक्या मेव्याच्या आयात दरात 10 ते 15 टक्क्यांची वाढ आधीच झाली आहे. याशिवाय, अफगाणिस्तानातून माल आणण्यासाठी इराणमधील चाबहार बंदर हा एक पर्यायी मार्ग म्हणून पाहिला जात आहे. तथापि, या मार्गाने होणारी मालवाहतूक एक महिना उशिराने पोहोचते, त्यामुळे मालाच्या ताजेपणावर आणि गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. याउलट, रस्ते मार्गाने होणारी वाहतूक फक्त तीन ते चार दिवसांत पूर्ण होते, पण पाकिस्तानमार्गे ती सध्या बंद असल्याने वाहतूक खर्चात मोठी वाढ अपेक्षित आहे.
सरतेशेवटी, व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की जर ही परिस्थिती लवकरच निवळली नाही, तर सणासुदीच्या काळात ग्राहकांना सुक्या मेव्याच्या वाढलेल्या किंमतीचा सामना करावा लागणार आहे.
Mumbai,Maharashtra
भारत-पाक तणावाचा सुका मेवा व्यापारावर परिणाम! दरवाढ होणार, सध्याचे बाजारभाव जाणून घ्या