आच्छादनासाठी स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणाऱ्या सेंद्रिय किंवा असेंद्रिय साहित्याचा वापर केला जातो. उदा. गव्हाचा भुसा, साळीचे तणिस, उसाचे पाचट, ज्वारीचा कडबा, झाडांचा पाला-पाचोळा तसेच काही ठिकाणी प्लॅस्टिक किंवा पॉलिथिन पेपर यांचा उपयोग होतो. हे साहित्य झाडांच्या बुंध्याभोवती पसरवल्याने जमिनीला थेट सूर्यप्रकाश मिळत नाही, त्यामुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया मंदावते आणि जमिनीत ओलावा टिकून राहतो.
फळझाडांच्या लागवडीत आच्छादनाचा उपयोग केल्यास अनेक फायदे होतात. विशेषतः उन्हाळी हंगामात फळझाडांची पाण्याची गरज लक्षणीयरीत्या वाढते. एका झाडासाठी सरासरी 30 लिटर पाण्याची गरज असते. मात्र, योग्य आच्छादन केल्यास या पाण्याचा अपव्यय टाळता येतो आणि सिंचन कार्यक्षमतेत वाढ होते.
रंगावरूनही जाणवतो परिणाम
पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक आच्छादनाचा वापर केल्यास जमिनीचे तापमान नियंत्रित राहते आणि पाण्याची बचत जास्त होते. याउलट, काळ्या रंगाच्या आच्छादनामुळे जमिनीचे तापमान ५ ते ८ अंश सेल्सिअसने वाढते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये काळ्या आच्छादनाचा उपयोग फायदेशीर ठरतो, तर उन्हाळ्यात पांढरे आच्छादन अधिक उपयुक्त मानले जाते.
आच्छादनाचा योग्य प्रमाणात वापर महत्त्वाचा
अति किंवा अत्यल्प आच्छादन झाडांसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे प्रत्येक झाडाभोवती 2 ते 5 सेंटीमीटर जाडीचा आच्छादनाचा थर द्यावा. तसेच, फळझाडांच्या अंतरावर अवलंबून प्रति एकर 5 ते 7 टन आच्छादन वापरण्याची शिफारस करण्यात येते.
सेंद्रिय आच्छादनाचा दुहेरी फायदा
विशेषतः उसाचे पाचट हे आच्छादनासाठी सर्वोत्तम मानले जाते. कारण एकदा वापर झाल्यानंतर, पुढील हंगामात हेच पाचट नांगरणीबरोबर जमिनीत मिसळल्यास चांगल्या सेंद्रिय खताचे रूप घेते आणि जमिनीची सुपीकता वाढवते.
दरम्यान, सध्याच्या हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवर आच्छादन पद्धत ही केवळ पाण्याची बचत करणारी नव्हे, तर शाश्वत शेतीकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. योग्य नियोजन, प्रमाणित वापर आणि स्थानिक साधनसामग्री यांचा समन्वय साधल्यास, शेतकऱ्यांना कमी पाण्यात जास्त उत्पादन घेता येईल.
Mumbai,Maharashtra
April 30, 2025 2:06 PM IST
कडक उन्हाळ्यात जमीनीचा ओलावा टिकवण्याचा सुपरहिट फॉर्म्युला! जाणून घ्या सविस्तर