Last Updated:
सध्या खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व तयारीला सुरुवात झाली असून, शेतकरी मोठ्या प्रमाणावर बियाण्यांची खरेदी करण्यासाठी कृषी दुकानांकडे वळत आहेत. मात्र, याच काळात डुप्लिकेट किंवा निकृष्ट बियाण्यांची बाजारात वाढती विक्री शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
बीड: सध्या खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व तयारीला सुरुवात झाली असून, शेतकरी मोठ्या प्रमाणावर बियाण्यांची खरेदी करण्यासाठी कृषी दुकानांकडे वळत आहेत. मात्र, याच काळात डुप्लिकेट किंवा निकृष्ट बियाण्यांची बाजारात वाढती विक्री शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. योग्य माहितीअभावी अनेक शेतकरी फसवणुकीला बळी पडत आहेत. त्यामुळे ही फसवणुक होवू नये म्हणून शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? याबद्दलचं कृषी तज्ज्ञ शरद राठोड यांनी माहिती दिली आहे.
शेतकऱ्यांनी बियाण्यांची खरेदी करताना अत्यंत काळजीपूर्वक निरीक्षण करणे आवश्यक आहे. कंपनीच्या नावावर नकली बियाण्यांची विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे, डुप्लिकेट बियाणं ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. डुप्लिकेट बियाणं ओळखण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे. राठोड सांगतात की, बियाण्यांच्या पिशवीवर स्पष्टपणे कंपनीचे नाव, लोगो, उत्पादन दिनांक, बॅच नंबर आणि प्रमाणित मार्क असणे गरजेचे आहे. शंका असल्यास, स्थानिक अधिकृत डीलरकडूनच खरेदी करावी. तसेच, पॅकेटवरील बारकोड स्कॅन करूनही अधिकृत माहिती मिळवता येते.
राठोड पुढे सांगतात की, अनेक वेळा डुप्लिकेट बियाण्यांचे अंकुरण दर कमी असतात आणि त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होते. त्यामुळे, एका पिशवीतून काही बियाणं उघडून त्यांचा रंग, वास आणि एकसंधता तपासणे देखील उपयुक्त ठरते. शक्य असल्यास, शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधून प्रमाणित विक्रेत्यांची यादी मागवावी.
बियाण्यांची खरेदी करताना चलाखीने निर्णय घ्या. स्वस्तात मिळणाऱ्या बियाण्यांमागे धावू नका. डुप्लिकेट बियाणं एकदा पेरल्यावर संपूर्ण हंगामाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे, खात्रीशीर कंपनीचे बियाणं, अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करा आणि स्वतःच्या मेहनतीचे फळ मिळवण्यासाठी सजग राहा, असं आवाहनही शरद राठोड यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
Bid,Maharashtra
June 05, 2025 4:17 PM IST
Agriculture News: शेतकऱ्यांनो, बियाणे खरेदी करताना फसवणुकीचा धोका, अशी घ्या काळजी, कृषी तज्ज्ञांचा सल्ला