सुरुवातीचे स्वप्न आणि मोठा निर्णय
शिक्षक वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वाढलेला समीर शिक्षणात अत्यंत उजवा होता. इंजिनिअरिंग पूर्ण करून नामांकित कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाल्यानंतरही त्याच्या मनात एकच ध्यास होता. स्वतःचा व्यवसाय उभारायचा. दुसऱ्याच्या कंपनीसाठी मेहनत करता करता त्याला जाणवलं की, हाच वेळ आणि कौशल्य स्वतःसाठी वापरल्यास तो केवळ यशस्वी उद्योजकच नाही तर इतरांसाठी रोजगारनिर्माता देखील बनू शकतो.
नोकरीचा त्याग आणि धाडसी सुरुवात
मनातील ठाम विश्वास घेऊन समीरने नोकरीचा राजीनामा दिला. आपली योजना वडिलांसमोर मांडली, आणि संपूर्ण कुटुंबानेही त्याच्या पाठीशी उभं राहत, घर विकून भांडवल उभं केलं. इंदूरमधील बंद पडलेली कंपनी विकत घेऊन त्याने व्यवसायाचा पहिला टप्पा सुरू केला. अडचणी आल्या, संकटे आली, पण समीरचा संयम आणि चिकाटी याने त्यावर मात केली.
नवीन उंची गाठली, स्वप्नाला मूर्त स्वरूप
2017 मध्ये अमरावतीच्या नांदगावपेठ एमआयडीसीमध्ये स्वतःचा नवीन प्लॉट घेत, ‘बेअरिंग केसिंग पाईप्स’ तयार करणाऱ्या युनिटची उभारणी झाली. संपूर्ण कुटुंब त्याच्या पाठीशी उभे राहिले — आई, वडील, पत्नी आणि भाऊ सर्वांनी व्यवसायाला स्वतःचं घर मानलं.
स्वतःचा व्यवसाय, इतरांचे स्वप्नही पूर्ण केले
फक्त स्वतःपुरतं यश न थांबवता, समीरने अनेक तरुणांसाठीही रोजगाराची दारे उघडली. आज त्यांच्या कंपन्यांमध्ये 30 हून अधिक कर्मचारी काम करत आहेत, त्यात आठ महिला कर्मचारीही आहेत. समीरच्या परिवारातील प्रत्येक सदस्याने विशिष्ट जबाबदाऱ्या सांभाळून व्यवसायाला बळ दिलं आहे.
समीरचा तरुणांना प्रेरणादायी संदेश
समीरने तरुणांना मोलाचा सल्ला दिला आहे तो म्हणतो की, “दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वतःसाठी झटणं केव्हाही चांगलं. मेहनत केलीत, तर अपयश हा फक्त एक टप्पा ठरतो यश हे शेवटचं सत्य असतं.”
दरम्यान, त्याच्या यशाने आजच्या तरुणांना सांगितलं आहे की, योग्य निर्णय, मेहनत, चिकाटी आणि कुटुंबाचा विश्वास यांचं मिळून दिलं तर कोणतंही स्वप्न अशक्य नाही.
Mumbai,Maharashtra
April 29, 2025 5:01 AM IST
नोकरी सोडली,घर विकलं आणि उभारला व्यवसाय! वयाच्या 30 व्या वर्षी तरुण झाला लखपती