मान्सूनचे यंदाचे लवकर आगमन
हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदा पोषक वातावरणामुळे मान्सून 13 मे रोजीच अंदमान-निकोबार बेटांपासून ते बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये दाखल झाला होता. नेहमी 20 ते 25 मे दरम्यान सुरू होणारा मान्सून यंदा 13 दिवस आधीच सुरू झाला.
बंगालच्या उपसागरातील बदलती हवामान परिस्थिती आणि अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे यामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक वातावरण मिळाले. परिणामी, शनिवारी तो केरळसह माहे, दक्षिण व मध्य अरबी समुद्र, लक्षद्वीप, कोमोरीन, तामिळनाडूचा काही भाग, मिझोराम आणि इतर भागांपर्यंत पोहोचला.
16 वर्षांनंतर ऐतिहासिक घटना
या आधी 23 मे 2009 रोजी मान्सून केरळमध्ये वेळेपेक्षा नऊ दिवस आधी दाखल झाला होता. त्यानंतर तब्बल 16 वर्षांनी पुन्हा एकदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा लवकर केरळमध्ये पोहोचल्याचे पाहायला मिळाले. यामुळे हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनची नोंद ऐतिहासिक अशी केली आहे.
या भागांना रेड अलर्ट जारी
महाराष्ट्रात सध्या मान्सूनपूर्व वळवाचा पाऊस जोरात बरसत आहे. गेल्या चार-पाच दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने रविवारी पुणे, कोल्हापूर, सातारा, कोकण परिसरात ‘रेड अलर्ट’ जाहीर केला असून, येत्या दोन-तीन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात प्रवेश करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईसह कोकणात यलो अलर्ट
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी पुढील तीन दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या कालावधीत मुसळधार पावसाचा अंदाज असून, 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
मान्सूनचा संपूर्ण प्रवास
मान्सून सहसा 1 जूनच्या आसपास भारतात दाखल होतो आणि 8 जूनपर्यंत बहुतांश देश व्यापतो. 17 सप्टेंबरच्या सुमारास त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो आणि 15 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशातून निरोप घेतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मान्सून केरळमध्ये लवकर किंवा उशिरा दाखल झाला म्हणजेच तो देशभरातही तसाच राहील, असे निश्चित सांगता येत नाही. हे पूर्णपणे वातावरणातील स्थितींवर अवलंबून असते.
Mumbai,Maharashtra
शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पुढील 3 दिवस धोक्याचे, या जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ जारी