Last Updated:
Agriculture News: पूर्वमोसमी पाऊस झाल्याने शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीच्या तयारीत आहे. कृषी विभागाने बी-बियाणे खरेदी करताना काळजी घेण्याचं आवाहन केलंय.
अहिल्यानगर: खरिपाचा हंगाम सुरू झाला असून काही प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीत आहे. परंतु, अनेकदा शेतकऱ्यांची बियाणे तसेच खतांमध्ये फसवणूक होते. त्यामुळे कृषी विभागाकडून यात लक्ष देऊन शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. खरेदी करण्यासाठी शासनमान्य दुकानातून खरेदी करा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी खते बियाणे व कीटकनाशके खरेदी करताना निविष्ठा परवानाधारक कृषी सेवा केंद्र विक्रेत्याकडूनच खरेदी करावे. तसेच विक्रेत्यांकडून पक्के बिल घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे यातून शेतकऱ्यांची फसवणूक टाळता येऊ शकते.
बियाणे घेण्यापूर्वी हे तपासा
बियाण्यांचे पाकीट किंवा पिशवी सीलबंद असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच खते खरेदी करताना जमीन आरोग्य पत्रिकेनुसार व पिकांच्या गरजेनुसार खताची मात्रा ठरवा. अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच पक्के बिल घेऊन खते खरेदी करावी. तसेच कीटकनाशके खरेदी करताना शेतकरी बांधवांना खते बियाणे विक्री करणारे केंद्रे विशिष्ट कंपनीचे खत किंवा बियाणे खरेदी करण्यासाठी सक्ती करत असेल किंवा चढ्या भावाने विक्री करत असेल तर कृषी विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
कमी पावसात जर पेरणी केली तर बियाणे उगवण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे 100 मिलिमीटर किंवा 110 मिलिमीटर जेव्हा पाऊस होईल त्यावेळेस पेरणी केली पाहिजे. बियाणे खरेदी करताना या गोष्टींचं काटेकोरपणे पालन केलं तर शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आला आहे.
Ahmadnagar,Maharashtra
शेतकऱ्यांच्या कामाची बातमी, कृषी विभागाने केलं आवाहन, खरीप हंगामात ती चूक नको!