Last Updated:
AI in Agriculture: सध्याच्या काळात सर्वच क्षेत्रात एआयचा बोलबाला असून शेतीतही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे. याबाबत सांगलीतील प्रगतशील शेतकऱ्याने माहिती दिलीये.
सांगली: आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI या अत्याधुनिक तंत्राचा बोलबाला सगळीकडे असून कृषी क्षेत्र देखील याला अपवाद राहिले नाही. महाराष्ट्र सरकारने नुकतेच कृषी क्षेत्रात AI चा वापर वाढण्याबाबत धोरण निश्चित करून, 500 कोटींच्या तरतुदीने प्रोत्साहन देऊ केले. अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्र असणाऱ्या शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा नेमका काय फायदा होतो, याबद्दल सांगलीचे प्रयोगशील शेतकरी विनोद तोडकर यांचा अनुभव लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कासेगावचे रहिवासी असलेले विनोद तोडकर हे प्रयोगशील शेतकरी आहेत. वाळवा तालुका परिसरामध्ये त्यांची शेतजमीन असून यापैकी आष्टा नजीक कारंदवाडी येथे 6 एकर शेतजमीन आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून असलेला शेतीचा अनुभव आणि स्वतः जिज्ञासूपणे केलेल्या अभ्यासाच्या जोरावर विनोद तोडकर शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. त्यांनी आजवर ऊस, हळद, ढोबळी मिरची तसेच विदेशी भाजीपाला पिकांमध्ये देखील दर्जेदार उत्पादनाचे विक्रम गाठले आहेत.
शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रयोगांसह नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. ठिबक सिंचन, ऑटोमेटेड इरिगेशन यासोबतच गेल्या पाच वर्षांपासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेचा(AI) वापर करत आहेत. “जगासोबत शेती क्षेत्र देखील पुढे गेलं पाहिजे. तंत्रज्ञानाचा उपयोग मानवी श्रम कमी करण्यासाठी आणि दर्जेदार उत्पादन वाढवण्यासाठी कसा करता येईल यावर विशेष लक्ष आहे,” असे प्रगतशील शेतकरी विनोद तोडकर यांनी लोकल18सोबत बोलताना सांगितले.
राहत्या घरापासून शेती 40 किलोमीटर दूर असल्याने ए. आय. तंत्रज्ञान वापरण्याचे त्यांनी ठरवले. कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होण्याच्या सुरुवातीच्या काळामध्येच त्यांनी पथदर्शी प्रकल्प म्हणून तंत्रज्ञान बसवून घेतले होते.
एआय तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पिकांची वाढ, पाण्याची गरज यासारख्या गोष्टी सॅटेलाइट इमेज वरून प्रत्यक्ष शेतामध्ये न येताच समजू लागल्या. यामुळे वेळोवेळी व्यवस्थापन करणे सोपे जात असल्याचा अनुभव प्रयोगशील शेतकरी विनोद तोडकर सांगतात. एआय मुळे पिकांबाबतची चिंता, प्रवास आणि वेळ वाचतो आहे. एआय तंत्रज्ञान फायदेशीर आणि समाधानकारक असल्यामुळे त्या तंत्रज्ञानामध्ये झालेल्या अत्याधुनिक बदलांसह योग्य ते प्रशिक्षण घेऊन त्याच्या वापराबाबत सकारात्मक असल्याचे प्रगतशील शेतकरी तोडकर यांनी सांगितले.
“घर आणि शेतातील अंतर दूर असल्याने एआय तंत्रज्ञान वापरणे माझी गरज होती. परंतु जे शेतकरी अत्यल्प भूधारक आहेत, मर्यादित उत्पन्न आहे, अशा शेतकऱ्यांना एआय सारख्या नवतंत्राचा खर्च परवडेल का?” याबाबत प्रश्न उपस्थित करत शक्य तितक्या कमी खर्चात शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची गरज शेतकरी तोडकर यांनी व्यक्त केली.
सध्या इतर क्षेत्रांमध्ये AI कडे एक आव्हान म्हणून पाहिले जात असताना, शेती क्षेत्रातील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि दर्जेदार उत्पन्न वाढीसाठी एआय वरदान ठरणार आहे. दरम्यान, सर्वच शेतकऱ्यांना अशा प्रकारचे नवतंत्रज्ञान फायदेशीर होईल अशी एआय धोरणाची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
Sangli,Maharashtra
July 05, 2025 4:34 PM IST