Last Updated:
यावर्षीही अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये अद्रक लावण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला सगळे काही सुरळीत सुरू होते, मात्र हंगामाच्या शेवटी काही शेतकऱ्यांच्या पदरी मात्र मोठी निराशा पडली.
बीड : बीड जिल्ह्यात मागील वर्षी अद्रक लागवडीने अनेक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न दिले होते. त्यामुळे यावर्षीही अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये अद्रक लावण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला सगळे काही सुरळीत सुरू होते, मात्र हंगामाच्या शेवटी काही शेतकऱ्यांच्या पदरी मात्र मोठी निराशा पडली. उत्पादन आणि बाजारभाव अपेक्षेप्रमाणे मिळाले नाहीत, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला.
नित्रुड गावचे विलास राठोड हे देखील याच अनुभवातून गेले आहेत. एका नामांकित कंपनीत 15 हजार रुपयांच्या पगारावर नोकरी करणारे राठोड काही कौटुंबिक अडचणींमुळे नोकरी सोडावी लागली. नोकरीत मिळवलेल्या पैशांची त्यांनी फाजील उधळपट्टी न करता बचत केली आणि शेतीत काहीतरी मोठं करण्याचा निर्धार केला. त्यांनी अद्रक लागवडीसाठी एक एकर जमीन निवडली आणि पूर्ण तयारीने कामाला लागले.
अद्रक लागवडीसाठी त्यांचा एकूण खर्च 75 हजार रुपये इतका झाला. बियाणं, खतं, औषधं आणि मजुरी यावर त्यांनी काटकसर न करता योग्य खर्च केला होता. सुरुवातीला पीक चांगले वाढत असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांच्या मनात मोठ्या उत्पन्नाचे स्वप्न देखील फुलले होते. मात्र निसर्गाच्या काही अनिष्ट घटनांमुळे व बाजारातील घसरणीमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली.
हंगाम संपल्यावर विलास राठोड यांच्या पदरी फक्त 45 हजार रुपयांचे उत्पन्न आले. त्यांनी केलेल्या 75 हजार रुपयांच्या गुंतवणुकीच्या तुलनेत हे उत्पन्न फारच तोकडे होते. नफा मिळवणे तर दूरच, उलट त्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. ही परिस्थिती पाहता आज ते पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
शेतीमध्ये कोणतीही नवी पद्धत अवलंबताना काळजीपूर्वक नियोजन करणे गरजेचे आहे. हवामान, बाजारपेठेची मागणी आणि पीक व्यवस्थापन यांचा योग्य अभ्यास करूनच पुढे पाऊल टाकणे आवश्यक आहे, अन्यथा मेहनत आणि गुंतवणूक वाया जाण्याची शक्यता राहते.
Bid,Maharashtra
April 18, 2025 6:48 PM IST
अद्रक लागवडीचा फसलेला प्रयोग, शेतकऱ्याच्या पदरी मोठी निराशा, खर्चही निघाला नाही! Video