लसीकरणामुळे जनावरांना होणाऱ्या अनेक प्राणघातक रोगांपासून संरक्षण मिळते. घटसर्प, फऱ्या, लंपी यांसारखे रोग गायी-बैलांसाठी घातक ठरतात, तर शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषार (Enterotoxaemia) मोठ्या प्रमाणावर मृत्यूला कारणीभूत ठरतो. अशा साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास पशुपालकांचे आर्थिक नुकसान प्रचंड मोठे होते.
राज्य व केंद्र सरकारकडून देशातील पशुधन रोगमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विविध योजनांतून लसींचा मोफत पुरवठा केला जातो. योग्य तापमान राखणारी शीत साखळी प्रणाली वापरून लसी पशुवैद्यकीय दवाखान्यांपर्यंत पोहोचवण्यात येतात. त्यानंतर अधिकृत कर्मचारी घरोघरी जाऊन जनावरांना लसीकरण करत असतात.
पशुपालकांनी काय काळजी घ्यावी?
लसीकरणानंतर बैलांना किमान एक आठवडा हलके काम द्यावे.
जनावरांना सकस आहार व आराम मिळावा, याची दक्षता घ्यावी.
लसीकरण झाल्यावर अतिउष्ण किंवा अति थंड हवामानात जनावरांना ठेवू नये.
जनावरांची लांब अंतरावर वाहतूक टाळावी.
सौम्य ताप किंवा गाठी आल्यास घाबरू नका. हे तात्पुरते असते.
गाठी कमी करण्यासाठी हलक्या हाताने चोळणे फायदेशीर ठरते.
गर्भवती जनावरांना लस टोचताना काळजी घ्या, पण लसीकरण टाळू नका.
लसीकरणानंतर दूध उत्पादन काही दिवस घटते, पण नंतर पूर्ववत होते.
रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यास 21 दिवसांचा कालावधी लागतो.
वासरांनाही लसीकरण आवश्यक
6 ते 8 आठवड्यांचे वासरंही या लसीकरणात सामील केली जावीत. लसीकरण झालेल्या प्रत्येक जनावराची माहिती नोंदवहीत नीट नोंदवून ठेवावी, जेणेकरून भविष्यात शासकीय योजनांचा लाभ घेणे सोपे होईल.
Mumbai,Maharashtra
May 25, 2025 12:55 PM IST