Last Updated:
BT 2 Cotton Seed: परराज्यातून विक्रीसाठी येणाऱ्या बोगस बियाण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या वेगवेगळ्या 70 भरारी पथके तयार केली आहे.
उदय तिमांडे, नागपूर : शेतकऱ्यांना फसवणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असून खरीप हंगाम तोंडावर येताच टोळ्यांच्या माध्यमातून बनावट राज्यात प्रतिबंधित असलेले BT 2 बियाणे विक्रीला सुरुवात केली आहे. इतर राज्यातील BT 2 बियाणे विदर्भात विकायला स्थानिक दलालांच्या माध्यमातून सुरुवात झाल्याची माहिती आहे.
परराज्यातून विक्रीसाठी येणाऱ्या बोगस बियाण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या वेगवेगळ्या 70 भरारी पथके तयार केली आहे. या पथकांच्या माध्यमातून सक्रीय दलालांवर लक्ष ठेवले जात असून काळाबाजार करणाऱ्या दलाल आणि कंपन्यांवर थेट फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस घेतला जातो. त्यामुळे खरीपाच्या पार्श्वभूमीवर अप्रमाणित असलेले BT2 कापूस बियाण्यांची आवक आता छुप्या पद्धतीने वाढत आहे. बोगस बियाणे तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात येथून महाराष्ट्रात येत आहे. हे बियाणे इतर बियाणांच्या तुलनेत स्वस्त आहे, त्यामुळे शेतकऱ्यांकडून याची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच ‘खर्च कमी उत्पादन जास्त’ असा प्रचार कंपन्यांकडून केला जातो. यालाच शेतकरी बळी पडत आहेत.
इतर राज्यातील बोगस पेरलेले बियाणे जर उगवले नाही तर याची तक्रार शेतकऱ्यांना कुठेही करता येत नाही. कारण हे बियाणे सरकार प्रमाणित नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईला देखील मुकावे लागते. शिवाय खरेदी केलेल्या बियाणांचे अधिकृत कोणतेच बिल दिले जात नाही. त्यामुळे एका बाजूने अस्मानी संकटाला तोंड देत असलेला शेतकरी कमी खर्चात उत्पन्न वाढेल ही भोळी अपेक्षा ठेवतो. पण बियाणे उगवले नाही तर आत्महत्येला प्रवृत्त होतो.
राज्यातील बोगस बियाणे विक्रीचा प्रकार नवा नाही. मात्र कृषी विभाग यावर कारवाई करण्यात कमी पडतो. त्यामुळे दलाल आणि कंपन्यांचे फोफावते. एका बाजूने सरकार कृषी उत्पन्न वाढविण्याचे स्वप्न दाखवत असताना दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांना बोगस बियाणे मिळणार नाही, यासाठी लक्ष देईल का? हा खरा सवाल आहे.
Nagpur,Maharashtra
खरीप हंगाम तोंडावर, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी, फसवणुकीआधी सावध व्हा!