Last Updated:
Agriculture News : महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, असे ठाम आश्वासन माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. हे आश्वासन केवळ सार्वजनिक व्यासपीठांवरच नव्हे, तर थेट महायुतीच्या जाहीरनाम्यातही नमूद करण्यात आले होते.
मुंबई : महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, असे ठाम आश्वासन माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. हे आश्वासन केवळ सार्वजनिक व्यासपीठांवरच नव्हे, तर थेट महायुतीच्या जाहीरनाम्यातही नमूद करण्यात आले होते. मात्र, सरकार स्थापनेला सहा महिने पूर्ण होत आले असतानाही अद्याप शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, ही बाब ग्रामीण भागात अस्वस्थता निर्माण करणारी ठरत आहे.
15 दिवसांत समिती नेमली जाणार
शनिवारी (दि.21 जून) पुण्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर माध्यमांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची बाजू मांडली. ते म्हणाले की, राज्य सरकारने नुकतेच प्रहारचे नेते बच्चू कडू यांना आश्वासन दिले की, पंधरा दिवसांच्या आत कर्जमाफीसंदर्भात समिती नेमली जाईल आणि समितीचा अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. याच मागणीसाठी बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. सरकारच्या सकारात्मक प्रतिसादानंतर त्यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
अजित पवार यांचा विरोधाभासी पवित्रा
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एका महिन्यांपूर्वीचे वक्तव्य अजूनही चर्चेत आहे. त्यांनी स्पष्टपणे विचारले होते, “शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले? मी तरी दिले नाही!” त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे महायुतीच्या अंतर्गत समन्वयावर आणि शेतकरी धोरणांवरील एकवाक्यतेवर प्रश्न उपस्थित झाले होते.
एकनाथ शिंदेंचाही पुनरुच्चार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा स्पष्ट केले होते की, “शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणारच आहे.” त्यामुळे महायुतीतील वेगवेगळ्या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे या मुद्द्यावर सरकारमध्ये एकसंध भूमिका अस्तित्वात आहे का? हा प्रश्न उपस्थित होतो आहे.
कर्जमाफीचा निर्णय कधी?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, “सरकार दिलेल्या वचनापासून माघार घेणार नाही. योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल. मात्र, त्यासाठी काही निश्चित प्रक्रिया व नियम आहेत, त्यानुसारच पुढील निर्णय होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
Mumbai,Maharashtra
June 21, 2025 2:46 PM IST