Last Updated:
Agriculture News : राज्यात मागील आठवड्याभरात झालेल्या पूर्वमोसमी पावसामुळे अनेक भागांत शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात अति पावसामुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे.
मुंबई : राज्यात मागील आठवड्याभरात झालेल्या पूर्वमोसमी पावसामुळे अनेक भागांत शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात अति पावसामुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त भागांतील पंचनामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
34 हजार हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान
राज्य सरकारकडून प्राप्त आकडेवारीनुसार, रविवारी (25 मे) पर्यंत राज्यात सुमारे 34 हजार हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. खरिप हंगाम सुरू होण्याच्या उंबरठ्यावरच अशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक शेतकरी नेत्यांनी “पंचनाम्यांची प्रतीक्षा न करता तात्काळ आर्थिक मदत द्यावी,” अशी मागणी सरकारकडे केली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत आढावा
मंगळवारी (27 मे) पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पावसाचा एकूण आढावा, पिकांचे नुकसान, धरणातील साठा, आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची तयारी यावर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी सांगितले की, ‘सचेत’ प्रणालीद्वारे 19 कोटींहून अधिक सतर्कतेचे संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवले गेले आहेत.
तांत्रिक तयारी आणि आपत्कालीन यंत्रणा सक्रिय
सेठी यांनी ही माहिती देखील दिली की राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात अत्याधुनिक संवाद व विश्लेषण प्रणाली कार्यरत आहे. नागपूर आणि धुळे येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची पथके तैनात करण्यात आली असून, नांदेड आणि गडचिरोली येथेही हालचाली सुरू आहेत.
मृत्यू आणि जखमींची माहिती
पावसामुळे राज्यात विविध दुर्घटनांमध्ये आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. वीज पडणे, झाडे कोसळणे, भिंती कोसळणे, आणि पाण्यात बुडणे अशा घटनांमुळे हे अपघात घडले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या मृतांच्या कुटुंबियांना नियमांनुसार तातडीची आर्थिक मदत देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
Mumbai,Maharashtra
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! तातडीने दिले हे आदेश