Last Updated:
Agriculture news : नागरिकांची दस्त नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता ‘एक जिल्हा, एक नोंदणी’ या उपक्रमाची अंमलबजावणी 1 मेपासून संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आली आहे.
पुणे : नागरिकांची दस्त नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता ‘एक जिल्हा, एक नोंदणी’ या उपक्रमाची अंमलबजावणी 1 मेपासून संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आली आहे. यामुळे संबंधित जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यातील जमिनीची नोंदणी, कोणत्याही तालुक्याच्या नोंदणी कार्यालयात करता येणार आहे.
पूर्वी, मुंबई शहर आणि उपनगर या दोन जिल्ह्यांत ‘एक राज्य, एक नोंदणी’ या उपक्रमाची प्रायोगिक अंमलबजावणी करण्यात आली होती. या पद्धतीत, दोन्ही जिल्ह्यांतील दस्त कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवता येत होते. परंतु, काही तांत्रिक अडचणींमुळे संपूर्ण राज्यभर अंमलबजावणी शक्य न झाल्याने, आता विभागाने हा उपक्रम जिल्हानिहाय मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नागरिकांना वेळ व खर्च वाचणार
या निर्णयामुळे दस्त नोंदणीसाठी नागरिकांना खास विशिष्ट तालुक्यात जाण्याची गरज उरणार नाही. जिल्ह्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदवता येणार असल्यामुळे, वेळ, पैसा आणि त्रास मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
काय सांगतात अधिकारी?
नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचे प्रमुख रवींद्र बिनवडे यांनी सांगितले की, “सर्व जिल्ह्यांतील दुय्यम निबंधक कार्यालयांचे कार्यक्षेत्र आता एकत्रित करण्यात आले आहे. यामुळे संबंधित जिल्ह्यातील कोणतीही मिळकत कुठल्याही कार्यालयात नोंदवता येईल.” सध्या ‘आय-सरिता 1.9’ या संगणक प्रणालीवर नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. पुढील टप्प्यात ‘सरिता 2.0’ प्रणाली विकसित केली जात असून, सध्या त्यावर ‘लिव्ह अँड लायसन्स’ प्रक्रिया सुरू आहे. मात्र, काही तांत्रिक अडचणी असल्याने ‘वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन’ हे संकल्पनात्मक उद्दिष्ट तूर्तास थांबवण्यात आले आहे.
किती कार्यालयांमध्ये उपलब्ध?
राज्यात 510 दुय्यम निबंधक कार्यालये, आणि फक्त ‘आय-सरिता 1.9’ प्रणालीवर आधारित 49 कार्यालयांमध्ये ही सेवा सध्या उपलब्ध आहे.
Mumbai,Maharashtra
नागरिकांचे काम होणार सोपं! तुमच्या सोयीचा तालुका निवडा अन् जमीनीची दस्त नोंदणी करा, ते कसं? वाचा सविस्तर