Last Updated:
शेतकऱ्यांना शेती करताना कीड, रोग आणि कमी दर्जाच्या रोपांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे उत्पादन खर्च वाढतो, तर उत्पन्न घटते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : शेतकऱ्यांना शेती करताना कीड, रोग आणि कमी दर्जाच्या रोपांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे उत्पादन खर्च वाढतो, तर उत्पन्न घटते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशभरात नऊ स्वच्छ रोप निर्मिती केंद्रे (Clean Plant Centers) उभारण्यात येणार असून, यातील तीन केंद्रे थेट महाराष्ट्रात उभारली जातील, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे.
पुणे, नागपूर आणि सोलापूर या तीन शहरांमध्ये अनुक्रमे द्राक्ष, संत्रा आणि डाळिंब पिकांसाठी विशेष स्वच्छ रोप निर्मिती केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. यासाठी केंद्र सरकारकडून तब्बल 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ही घोषणा त्यांनी पुण्यात आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन स्पर्धेच्या समारोपप्रसंगी केली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, तसेच कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी हे देखील उपस्थित होते.
शेतकऱ्यांना आधुनिक व दर्जेदार शेतीकडे नेणार
केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी सांगितले की, “रोपांचे स्वच्छ उत्पादन हे कृषी क्षेत्रात एक प्रकारचे मूलभूत इनपुट आहे. जर रोपेच रोगमुक्त, कीडमुक्त व दर्जेदार असतील, तर शेतकऱ्यांना उत्पादनात निश्चित फायदा होतो. त्यामुळे हे केंद्रे शेतकऱ्यांना आधुनिक व दर्जेदार शेतीकडे घेऊन जाण्यास मदत करतील.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हॅकेथॉन स्पर्धेत सादर झालेल्या नवीन स्टार्टअप कल्पनांना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्याचा सरकारचा मानस असल्याचे सांगितले. “फक्त संशोधनापुरते मर्यादित न राहता, ते प्रत्यक्षात उतरवले पाहिजे. त्यासाठी पुण्यातील कृषी महाविद्यालयात इनक्युबेशन सेंटर उभारण्याचे निर्देश कृषिमंत्री आणि कृषी आयुक्तांना देण्यात आले आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांना काय फायदा होणार?
या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दर्जेदार आणि रोगविरहित रोपे सहज मिळू शकतील. परिणामी, उत्पादनात सातत्य आणि गुणवत्ता वाढून निर्यातक्षम उत्पादनास चालना मिळेल. विशेषतः द्राक्ष, संत्रा आणि डाळिंब ही महाराष्ट्रातील महत्त्वाची निर्यातयोग्य हायव्हॅल्यू पिके असल्याने या केंद्रांचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
Mumbai,Maharashtra
June 04, 2025 12:54 PM IST
राज्यातील 3 जिल्ह्यात सुरू होणार कृषी प्रकल्प! 300 कोटींचा निधी जाहीर,काय फायदा होणार?