Last Updated:
Ration Card : शिधापत्रिकेला आधार क्रमांक संलग्न करून त्यावरील नावाची पडताळणी करण्याची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने दिलेली अंतिम मुदत 31 मार्चपासून वाढवून आता 30 एप्रिल 2025 पर्यंत करण्यात आली होती. अशातच आत्ता या प्रक्रियेला फक्त एक दिवस शिल्लक राहिला आहे.
मुंबई : शिधापत्रिकेला आधार क्रमांक संलग्न करून त्यावरील नावाची पडताळणी करण्याची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने दिलेली अंतिम मुदत 31 मार्चपासून वाढवून 30 एप्रिल 2025 पर्यंत करण्यात आली होती. अशातच आत्ता या प्रक्रियेला फक्त एक दिवस शिल्लक राहिला आहे. 30 एप्रिलपूर्वी ई-केवायसी न करणाऱ्या लाभार्थ्यांची नावे शिधापत्रिकेतून वगळली जातील, आणि त्यांना शिधा मिळणार नाही. असा इशारा सरकारने दिला आहे.
सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारने राज्य सरकारला राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी पडताळणी करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या होत्या. त्यानुसार राज्यातील सर्व रास्त भाव दुकानांवर (राशन दुकान) ई-केवायसी मोहीम राबवली जात आहे आणि ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत.
ई-केवायसी कशी करावी?
ई-केवायसी प्रक्रिया खालीलपैकी कोणत्याही एक पद्धतीने पूर्ण करता येते:
1) रास्त भाव दुकान
आपल्या जवळच्या शिधावाटप केंद्रावर (राशन दुकान) जा. शिधापत्रिका आणि आधार कार्ड सोबत घ्या. दुकानात बायोमेट्रिक मशीनद्वारे अंगठ्याचा ठसा देऊन आधार पडताळणी केली जाईल. यानंतर तुमची ई-केवायसी पूर्ण झाली समजली जाईल.
2) मोबाईल अॅपद्वारे (Mera KYC App):
Google Play Store किंवा Apple App Store वरून “Mera KYC” हे अॅप डाउनलोड करा.अॅपमध्ये शिधापत्रिका क्रमांक व आधार क्रमांक प्रविष्ट करा. ओटीपीद्वारे मोबाईल पडताळणी करा. आधारशी संलग्न असलेल्या नावाची पुष्टी करा. आवश्यक असल्यास बायोमेट्रिक पडताळणीसाठी नजीकच्या सेवा केंद्रावर भेट द्या.
3) महा ई-सेवा केंद्र / CSC केंद्र
जवळच्या CSC (Common Service Center) किंवा महा ई-सेवा केंद्रावर भेट द्या. तिथे कर्मचाऱ्यांच्या मदतीने बायोमेट्रिक व आधार पडताळणी करून ई-केवायसी पूर्ण करता येते.
ई-केवायसी 30 एप्रिलपूर्वी पूर्ण करणे अनिवार्य आहे. ही प्रक्रिया एकदाच केली जाणारी आहे. आधार क्रमांक आणि शिधापत्रिकेवरील नावामध्ये विसंगती असल्यास ती तात्काळ सुधारावी.ई-केवायसी झाल्यानंतर पुन्हा केवायसी करण्याची गरज नाही. ई-केवायसीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून आपली शिधापत्रिका सुरूच राहील याची खात्री करा.
Mumbai,Maharashtra
April 29, 2025 1:33 PM IST
रेशन कार्डसंदर्भातील महत्वाची अपडेट! फक्त एक दिवस शिल्लक, हे काम न केल्यास कार्ड होणार बंद