Last Updated:
Farmer Success Story: निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्याच्या हातामध्ये फारसे पैसे उरत नाहीत. त्यामुळे पारंपरिक पिकांना फाटा देऊन शेतीमध्ये नवनवीन पिके घेणे प्रयोग करणे गरजेचे आहे.
जालना: मराठवाड्यातील शेतकरी प्रामुख्याने सोयाबीन आणि कापूस ही प्रमुख पिके घेतात. परंतु निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्याच्या हातामध्ये फारसे पैसे उरत नाहीत. त्यामुळे पारंपरिक पिकांना फाटा देऊन शेतीमध्ये नवनवीन पिके घेणे प्रयोग करणे गरजेचे आहे. जालन्यातील भरडखेडा येथील तरुण शेतकरी दीपक पालवे यांनी दोन एकर जांभूळ शेती फुलवली आहे. सहा वर्षांच्या या झाडांना तब्बल 10 टन जांभूळ लागले असून यातून 8 ते 10 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील भरडखेडा हे एक छोटसं खेडेगाव. सोयाबीन कापूस ही पारंपारिक पिके इथली प्रमुख पिके. दीपक पालवे हे देखील हीच पारंपारिक पिके घ्यायचे. परंतु निसर्गाच्या अवचक्रामुळे नेहमीच नुकसान व्हायचं. त्यामुळे नवं काहीतरी करण्याचं त्याच्या डोक्यात होतं.
सोशल मीडियावरील जांभूळ शेतीचा व्हिडिओ पाहून त्यांनी आपल्या शेतामध्ये जांभूळ रोप लावण्याचा निर्णय. पालघर येथून बहडोली वाणाची जांभळाची रोपे मागवली. सोळा बाय 16 अंतरावर आपल्या दोन एकर क्षेत्रात 400 झाडांची लागवड केली. या झाडांचे संपूर्ण व्यवस्थापन सेंद्रिय पद्धतीने केलं. कोणत्याही कीटकनाशकाचा खताचा वापर केला नाही. झाडांना फळे लगडन्यास सुरुवात झाली.
पहिल्या वर्षी 4 लाख दुसऱ्या वर्षी 6 लाख पर्यंत तिसऱ्या वर्षी 8 ते 10 लाखांचं उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे. एक झाडावर तीस ते चाळीस किलोच्या दरम्यान जांभळ आहेत. या जांभळांना जाग्यावरच शंभर ते दीडशे रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. शेतामध्ये फळ पिकं करायला धाडस लागतो. त्याचबरोबर योग्य नियोजन केलं तर हे पिके यशस्वी होऊ शकतात. सोयाबीन, कापूस यासारखी पारंपरिक पिके आता परवडत नाहीत. त्यामुळे तरुणांनी शेतीला व्यवसाय म्हणून पाहिल्यास आणि नवनवीन पिके घेतल्यास नक्कीच फायदा होतो, असं दीपक याने सांगितलं.
Jalna,Maharashtra
June 16, 2025 8:45 PM IST
Farmer Success Story: सोशल मीडियावर व्हिडीओ पाहिला, शेतात केली 400 झाडांची लागवड, उत्पन्न 10 लाख