नियम काय सांगतो?
जर वडिलांनी जी मालमत्ता दिली ती स्वतःच्या उत्पन्नातून, व्यवसायातून किंवा नोकरीच्या माध्यमातून मिळवलेली असेल, म्हणजे ती स्वअर्जित मालमत्ता असेल, तर ती त्यांची वैयक्तिक मालमत्ता मानली जाते. भारतीय कायद्यानुसार अशा मालमत्तेवर वडिलांना संपूर्ण हक्क असतो आणि ते ती मालमत्ता त्यांच्या इच्छेनुसार कोणालाही देऊ शकतात. मग ती वसीयत (Will) करून असो, गिफ्ट डीडद्वारे असो किंवा विक्रीद्वारे.
या परिस्थितीत इतर मुलांना किंवा मुलींना त्या मालमत्तेवर कायदेशीर दावा करता येत नाही. दुसऱ्या भावंडांनी भावनिक स्तरावर नाखूशी व्यक्त केली, तरी कायद्याच्या चौकटीत त्यांचा दावा फारसा ठरत नाही.
वडिलोपार्जित मालमत्तेवर सर्वांची समान हक्कधारी भूमिका
जर मालमत्ता वडिलांच्या नावावर त्याच्या वडिलांकडून वारशाने मिळाली असेल, आणि तिचं कायदेशीर विभाजन अद्याप झालेलं नसेल, तर ती वडिलोपार्जित मालमत्ता मानली जाते. अशा मालमत्तेवर वडिलांचा एकट्याचा हक्क राहत नाही. तो एक सह-वारसदार म्हणून ओळखला जातो.
यामध्ये सर्व भावंडं समान हक्काची मानली जातात. अशा वेळी वडिलांनी मालमत्ता फक्त एका मुलाच्या नावावर केली असेल, तरी ती कायदेशीर वैध ठरत नाही. बाकीच्या भावंडांना कोर्टात जाऊन त्यांच्या वाट्याचा दावा करण्याचा हक्क राहतो.
वसीयत असल्यास काय?
जर वडिलांनी वसीयत केली असेल आणि संपूर्ण मालमत्ता एका मुलाच्या नावे केली असेल, तरी ती वसीयत फक्त त्यांच्या मृत्यूनंतर प्रभावी होते. शिवाय, वसीयत वैध आहे की नाही हे सिद्ध करावं लागतं.
उदाहरणार्थ, जर वडिलांनी अपंग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा वडिलांची सेवा करणाऱ्या मुलाला पूर्णतः डावलले असेल, तर इतर भावंड ती वसीयत कोर्टात आव्हानित करू शकतात. अशा केसमध्ये नैसर्गिक न्याय आणि कौटुंबिक समतोल याचा विचार करून कोर्ट निर्णय देतं.
थोडक्यात काय तर, स्वअर्जित मालमत्ता असल्यास,वडिलांना एकट्याला वाटपाचा अधिकार आहे.वडिलोपार्जित मालमत्ता असल्यास, सर्व भावंडांचा समान वाटा आहे. वसीयत असेल तरी तिचं कायदेशीर मूल्य आणि योग्यतेची शहानिशा कोर्टात केली जाते.
(महत्वाची सूचना – सदर बातमी फक्त माहिती करिता आहे. कोणतीही कारवाई करण्याआधी कायदेशीर सल्ला घ्यावा)
Mumbai,Maharashtra
June 04, 2025 1:48 PM IST
पित्याने एकाच्या नावावर मालमत्ता केल्यास दुसऱ्या मुलाचं काय? दावा करू शकतो का?