Last Updated:
Farmer Scheme: घात, अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीत बऱ्याचदा शेतकऱ्यांना जीव गमवावा लागतो. अशा शेतकरी कुटुंबांसाठी अनुदान योजना आहे.
छत्रपती संभाजीनगर – घात, अपघातात किंवा नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडणारे शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासनाकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत 2 लाख रुपये देण्यात येतात. तसेच कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये अनुदान मिळते. शेतात काम करीत असताना वीज अंगावर पडून किंवा सर्पदंश होणे अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. अशा कुटुंबांना मदत म्हणून दोन लाख रुपये शासनाकडून मिळतात, असे छत्रपती संभाजीनगर तालुका कृषी अधिकारी मेघशाम गुळवे यांनी सांगितले.
गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत अपघातग्रस्त कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या दोन लाख रुपये या मदतीसाठी पात्र उमेदवाराचे वय 10 ते 75 वर्ष इतके असावे, तसेच अपघात घडल्यापासून 30 दिवसांच्या आत या योजनेसाठी तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा आणि त्यानंतर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडते. त्यानंतर जिल्हास्तरीय समितीला तो अर्ज पडताळणी करण्यासाठी पाठवण्यात येतो. त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अनुदानित रक्कम खात्यात जमा केली जाते, असे देखील गुळवे यांनी सांगितले.
अर्ज कसा करावा?
गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजनेसाठी तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे अर्जाची फोटोसह प्रत जमा करणे आवश्यक असते. अपघात झाला असल्यास ड्रायव्हिंग लायसन्स आणि बाकीचे आधार, पॅन कार्ड असे विविध कागदपत्रे लागतात. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह योजना शेतकऱ्यांच्या कुटुंबाला अचानक येणाऱ्या आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे अशा शेतकरी कुटुंबीयांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
Aurangabad,Maharashtra
June 10, 2025 9:50 PM IST
Farmer Scheme: अपघात असो की नैसर्गिक आपत्ती, त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मिळणार 2 लाख अनुदान!