Last Updated:
Property Rules : आपल्या आयुष्यात मिळवलेल्या संपत्तीचं योग्य नियोजन हे केवळ आपल्यासाठीच नव्हे, तर पुढच्या पिढ्यांसाठीही अत्यंत महत्त्वाचं असतं. मात्र दुर्दैवाने अनेकजण मृत्युपत्र (Will) करताना याकडे गांभीर्याने पाहत नाहीत किंवा चुकीच्या मार्गांचा अवलंब करतात.
मुंबई : आपल्या आयुष्यात मिळवलेल्या संपत्तीचं योग्य नियोजन हे केवळ आपल्यासाठीच नव्हे, तर पुढच्या पिढ्यांसाठीही अत्यंत महत्त्वाचं असतं. मात्र दुर्दैवाने अनेकजण मृत्युपत्र (Will) करताना याकडे गांभीर्याने पाहत नाहीत किंवा चुकीच्या मार्गांचा अवलंब करतात. काहीजण दुसऱ्याचं मृत्युपत्र कॉपी करतात, तर काहीजण इंटरनेटवरील अर्धवट माहितीच्या आधारे आपलं इच्छापत्र तयार करतात. त्यामुळे अशा मृत्युपत्रांमुळे संपत्तीचे वाटप करताना अनेकदा कायदेशीर अडथळे निर्माण होतात, आणि त्याचा त्रास वारसांना सहन करावा लागतो.
कायदा काय सांगतो?
भारतीय वारसा कायद्यानुसार, 1925 मधील “Indian Succession Act” मधील कलम 109 ही यासंदर्भातील महत्त्वाची तरतूद स्पष्ट करते. या कलमानुसार, जर मृत्युपत्र करणाऱ्याने त्याची संपत्ती विशिष्ट मुलगा, मुलगी किंवा रेषीय वंशज (उदा. नातवंडे, पणतवंडे) यांना दिली असेल आणि त्यापैकी लाभार्थी व्यक्ती मृत्युपत्र करणाऱ्याच्या हयातीतच मरण पावली, तर ती संपत्ती त्या लाभार्थीच्या रेषीय वंशजांना मिळते. म्हणजेच जर लाभार्थी मुलगी मृत्युपत्र करणाऱ्याच्या निधनाआधीच मरण पावली, तर तिच्या नवऱ्याला नव्हे, तर तिच्या मुलांना तिचा हिस्सा मिळतो.
कायद्यात पुढे नमूद केलं आहे की, जर मृत्युपत्रात अशा परिस्थितीबाबत वेगळी तरतूद नसेल, तर लाभार्थी व्यक्ती ही मृत्युपत्रकर्त्याच्या नंतर मरण पावली असे गृहीत धरले जाते. त्यामुळे इच्छापत्र करताना कोण लाभार्थी असेल आणि तो लाभार्थी हयात नसेल तर दुसरा पर्याय कोण असावा, याची सुस्पष्ट मांडणी केली पाहिजे.
एक महत्त्वाची बाब म्हणजे “रेषीय वंशज” ही संकल्पना केवळ पुरुष वारसांपुरती मर्यादित नसून, त्यात मुलींचाही समावेश होतो. याबाबत 1921 मध्ये प्रिव्ही कौन्सिलने (ब्रिटिशकालीन सर्वोच्च न्यायालय) “भीमनाथ मिस्सीर विरुद्ध तारा दाई” प्रकरणात स्पष्ट निर्णय दिला आहे. त्यामुळे वारस हक्कात लिंगभेद होऊ शकत नाही.
अनेक वेळा प्रत्यक्ष व्यवहारात हे आढळते की, पालक मृत्युपत्र करून संपत्ती मुलगा किंवा मुलीच्या नावे ठेवतात. पण जर ती व्यक्ती मृत्युपत्रकर्त्यापूर्वीच मरण पावली, तर संपत्तीचा हक्क कोणाला असेल, याचा विचार केला जात नाही. अनेक पालक यावर विचार करताना अस्वस्थ होतात. पण वास्तव हे आहे की, मृत्युपत्र करताना ‘प्लॅन बी’म्हणजे पर्यायी लाभार्थी याचा उल्लेख करणे अत्यावश्यक आहे.
म्हणूनच कायद्यानुसार स्पष्ट व व्यवस्थित मृत्युपत्र तयार करणे गरजेचे आहे. यासाठी तज्ज्ञ वकीलांचा सल्ला घेणे सर्वार्थाने उपयुक्त ठरते. त्यामुळे पुढील पिढ्यांना त्रास न होता आपली संपत्ती हक्काने आणि न्यायरित्या वाटली जाईल, याची खात्री होते.
Mumbai,Maharashtra
June 11, 2025 9:43 AM IST
मृत्युपत्राचा लाभार्थीच आधी मयत झाल्यास संपत्तीचं वाटप कसं होतं? कायदा काय सांगतो?