Last Updated:
Saur Krushi Pump Yojana : राज्यातील अनेक भागांमध्ये मे महिन्यात आलेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या सौर कृषीपंप सेट्सचे मोठे नुकसान झाले आहे.
मुंबई : राज्यातील अनेक भागांमध्ये मे महिन्यात आलेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या सौर कृषीपंप सेट्सचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः विहिरीवर किंवा बोअरवेलवर बसवलेले सोलार पॅनल्स वाऱ्याच्या जोरामुळे उलटले, फुटले किंवा काही ठिकाणी पंपच उखडून गेले. त्याच बरोबर सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यातही असे प्रकार घडू शकतात.परिणामी, पाणीपुरवठ्याची यंत्रणा कोलमडली असून शेतकऱ्यांना पाणी व वीजटंचाईचा सामना करावा लागत आहे.
तथापि, राज्य सरकारच्या सौर योजनांमुळे अशा आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. ‘कुसुम योजना’ आणि ‘मागेल त्याला सौर कृषीपंप योजना’ अंतर्गत बसवण्यात आलेल्या सौर पंपांसाठी पाच वर्षांची मोफत दुरुस्ती आणि देखभाल सेवा देण्यात येते. त्यामुळे निसर्गाच्या आपत्तीत झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना कोणताही आर्थिक भार न घेता तांत्रिक सेवा मिळू शकते.
अर्ज कसा करावा?
सौर पंप किंवा पॅनल खराब झाल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ तक्रार नोंदवणे अत्यावश्यक आहे. यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत.
ऑनलाइन अर्ज
कुसुम योजना किंवा मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. तेथे उपलब्ध असलेला तक्रार नोंदणी फॉर्म भरावा. फॉर्ममध्ये पंप क्रमांक, युनिट नंबर, सोलार पॅनलच्या नुकसानीचे फोटो, आणि शेतकऱ्याचे तपशील भरावेत.
ऑफलाइन अर्ज
जवळच्या महावितरण कार्यालयात जाऊन तक्रार सादर करता येते. संबंधित अधिकारी ती तक्रार पुरवठादार कंपनीकडे पाठवून दुरुस्ती प्रक्रियेचा पाठपुरावा करतात.
खर्च नाही, काळजी नाही
या दुरुस्ती सेवेसाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जात नाही. पाच वर्षांच्या हमी कालावधीदरम्यान हे सेवा पूर्णपणे मोफत मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता किंवा खर्च होईल या भीतीने तक्रार टाळू नये. शासनाच्या या उपयुक्त योजनेचा लाभ घ्या, वेळेवर अर्ज सादर करा आणि सौर पंपाची दुरुस्ती करून शेतातील पाणीपुरवठा पूर्ववत चालू ठेवा. यामुळे शेतीतील अडथळे दूर होतात आणि पीक उत्पादन सुरळीत राहते.
Mumbai,Maharashtra
June 21, 2025 8:17 AM IST
शेतकऱ्यांना दिलासा! सोलार पॅनलचे नुकसान झालं तर सरकार देणार मदत, अर्ज कसा करायचा?