शेतकऱ्यांना वारंवार वन्य प्राणी जसे की डुक्कर, हत्ती, हरिण, नीलगाय यांच्यामुळे पिकांवर होणाऱ्या हल्ल्याला सामोरे जावे लागते. याशिवाय, अनियमित पाऊस, दुष्काळसदृश्य परिस्थिती आणि पाणीटंचाईसारख्या संकटांमुळे त्यांचे उत्पादन आधीच मर्यादित होते. अशा परिस्थितीत पीक वाचवणे ही सर्वात मोठी जबाबदारी ठरते.
योजनेचे उद्दिष्ट काय आहे?
शेतजमिनीच्या संरक्षणासाठी काटेरी तारांचे कुंपण हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. पण तो महाग असल्याने अनेक शेतकरी ते टाळतात. ही अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने ‘तार कुंपण योजना’ सुरू केली आहे. या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना 90% पर्यंत अनुदानावर कुंपण उभारण्यासाठी आवश्यक सामग्री उपलब्ध करून दिली जाते.
योजनेअंतर्गत 2 क्विंटल काटेरी तार, 30 लोखंडी खांब हे शेतकऱ्यांना दिले जातात आणि त्याचा 90% खर्च शासन उचलते, तर फक्त 10% खर्च शेतकऱ्यांना स्वतः करावा लागतो.
या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना कसा होईल?
या उपक्रमामुळे वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण होईल.
शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळेल.
शेती उत्पादनात वाढ होईल.
शेतीमध्ये स्थैर्य आणि सुरक्षा निर्माण होईल.
योजनेची अटी व पात्रता काय आहे?
‘तार कुंपण अनुदान योजना’चा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी शेतकऱ्यांना पूर्ण कराव्या लागतात जसे की,
शेतजमिनीवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण नसावे.
वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक मार्गात येणाऱ्या जमिनींना याचा लाभ मिळणार नाही.
ग्राम परिस्थिती विकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडून संमती पत्र आवश्यक.
योजनेत फक्त पात्र शेतकऱ्यांनाच 2 क्विंटल तार आणि 30 खांब अनुदानावर दिले जातील.
अर्ज कसा करावा?
शेतकऱ्यांनी योजनेसाठी स्वत:च्या तालुक्यातील पंचायत समितीकडे अर्ज सादर करावा. अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे जसे की,
सातबारा उतारा आणि गाव नमुना 8
शेतकऱ्याचा आधार कार्ड
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
शेतीवर एकाहून अधिक मालक असल्यास सर्व मालकांचे संमतीपत्र
ग्रामपंचायतीचा अधिकृत दाखला
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
Mumbai,Maharashtra
June 21, 2025 11:08 AM IST
शेताच्या संरक्षणासह जंगली प्राण्यांची समस्या सुटणार! कुंपणासाठी सरकार देतंय पैसे, असा करा अर्ज