1) केवळ प्रमाणित विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करा
शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना शासनमान्य, नोंदणीकृत दुकानांमधूनच खरेदी करावी. यासाठी कृषी विभागाच्या वेबसाइटवर अधिकृत विक्रेत्यांची यादी उपलब्ध असते. बऱ्याचदा रस्त्याच्या कडेला, बाजारपेठांमध्ये अनधिकृत विक्रेते स्वस्तात बियाणे देण्याचे आमिष दाखवतात. मात्र ही बियाणे कमी उत्पादनक्षम किंवा अप्रमाणित असू शकतात.
2) बियाण्यांचे प्रमाणपत्र आणि पॅकिंग तपासा
प्रत्येक बियाण्याच्या पिशवीवर टॅग, प्रमाणपत्र क्रमांक, पॅकिंगची तारीख, उपयुक्ततेचा कालावधी आणि उत्पादन कंपनीची माहिती दिलेली असते. पॅकिंगमधील बियाण्याची गुणवत्ता, अंकुरण्याची टक्केवारी (Germination Rate), आर्द्रता, शुद्धता यांची माहिती पाहणे गरजेचे आहे.
3) बिल घ्या आणि सुरक्षित ठेवा
खरेदी करताना हमखास बिल घ्यावे आणि ते व्यवस्थित सुरक्षित ठेवावे. भविष्यात बियाण्यामुळे नुकसान झाल्यास किंवा फसवणूक झाल्यास, याच बिलाच्या आधारे तक्रार दाखल करता येते. अनेक वेळा शेतकरी रोखीने खरेदी करून बिल न घेतल्याने त्यांना पुरावा सादर करता येत नाही.
4) ऑफर्सपासून सावध राहा
“खास उत्पादन देणारी नवीन जात””स्वस्तात अधिक उत्पन्न” यासारख्या जाहिरातींच्या जाळ्यात अडकू नका. शंका असल्यास स्थानिक कृषी विस्तार अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.
5)शासनाच्या योजनेचा लाभ घ्या
राज्य शासन दरवर्षी 100% अनुदानित किंवा सबसिडीवर बियाण्यांचे वितरण करते. खरीप हंगामात वेळेत अर्ज केल्यास शेतकऱ्यांना विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण बियाणे सरकारी यंत्रणेमार्फत मिळू शकते. ‘महाडीबीटी पोर्टल’वरून अर्ज करून शेतकऱ्यांनी अधिकृत योजनेचा लाभ घ्यावा.
6)फसवणूक झालीच तर काय करावे?
राज्य सरकारने ‘बियाणे नियंत्रण अधिनियम 1966’ अंतर्गत अशा प्रकरणांवर कठोर कारवाईची तरतूद केली आहे. संबंधित शेतकरी कृषी विभागाकडे तक्रार करू शकता. नंतर फसवणूक करणाऱ्या कंपनीवर दंड किंवा फौजदारी कारवाईही होऊ शकते.
Mumbai,Maharashtra
June 09, 2025 8:21 AM IST