मुंबई: महाराष्ट्रातील उन्हाळी हंगामात विविध प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मुख्यतः कलिंगड, खरबूज, काकडी, दोडका, घोसाळी, कारली, दुधी भोपळा, तोंडली, तांबडा भोपळा, भेंडी, गवार, टोमॅटो, वांगी, मिरची, चवळी, घेवडा, कोथिंबीर, कांदापात, मेथी, राजगिरा, माठ आणि पोकळा यांचा समावेश होतो. या हंगामातील भाजीपाला लागवडीबाबत योग्य नियोजन आणि काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
कोणती काळजी घ्यावी?
लागवडीसाठी सेंद्रिय घटकांनी समृद्ध आणि पाण्याचे चांगले निचरायुक्त जमीन निवडावी. तसेच जमिनीवर आच्छादनाचा वापर करून आर्द्रता टिकवावी. गरम वाऱ्यांपासून बचावासाठी शेताच्या कडेला उंच वाढणारी झाडे किंवा मक्याच्या दाट झाडी लावाव्यात. कीड आणि रोगप्रतिकारक जाती निवडून योग्य प्रमाणात सिंचन आणि खत व्यवस्थापन करावे.फळांची तोडणी शक्यतो संध्याकाळी करावी आणि स्वच्छ ठिकाणी त्याचे प्रतवारीकरण, पॅकिंग व साठवणूक करावी. मालवाहतूक पहाटेच्या वेळी करणे फायदेशीर ठरेल.
भेंडी आणि गवार
उन्हाळी हंगामात भेंडी व गवार यांची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. भेंडीच्या लागवडीसाठी परभणी क्रांती, अर्क अनामिका, पुसा सवानी आणि पंजाब पद्मनी ही वाणे उपयुक्त ठरतात. गवारीसाठी पुसा सदाबहार व पुसा नवबहार या जाती उत्पादनक्षम मानल्या जातात. योग्य सिंचन व्यवस्थापन आणि संध्याकाळी (साधारण 5 नंतर) तोडणी केल्यास चांगल्या प्रतीचा माल मिळतो.
वेलवर्गीय भाज्या
काकडी, कारली, दुधी भोपळा, दोडका आणि घोसाळी या पिकांची बियाण्याद्वारे रुंद अंतरावर लागवड केली जाते. बिया उगवल्यानंतर वेलीला आधार देणे गरजेचे असते. उत्तम उत्पादनासाठी मंडप किंवा ताटी पद्धतीचा अवलंब करावा. कमकुवत वेलींना आधार दिल्यास त्यांची वाढ अधिक होते.
वेलींना आधार देण्यासाठी योग्य उपाय
मंडप किंवा ताटी पद्धतीमुळे फळे जमिनीपासून उंच राहतात आणि त्यांची गुणवत्ता सुधारते.
चांगला सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे फळांचा रंग आकर्षक राहतो.
फवारणी आणि तोडणी अधिक सोयीस्कर होते.
मंडप पद्धतीमुळे दुधी भोपळ्याच्या उत्पादनात 2.5 ते 3 पट वाढ होऊ शकते.
मिरची, वांगी आणि टोमॅटो
या पिकांची रोपे गादी वाफ्यावर तयार करावी. डिसेंबर-जानेवारीत बियाणे पेरल्यास जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान रोपांची लागवड करता येते. मिरचीच्या लागवडीसाठी उंच वाढणाऱ्या व भरपूर फांद्या असणाऱ्या जाती निवडाव्यात. मिरचीची झाडे झुपक्यात येणाऱ्या फुलांनी युक्त असावीत.
कोथिंबीर
कोथिंबिरीला कोरडे हवामान पोषक ठरते. उन्हाळी हंगामात कमी पाण्यावर हे पीक चांगले उत्पादन देते. वाफे तयार करून आठवड्याच्या अंतराने लागवड करावी.
पालेभाज्यांचे महत्त्व
उन्हाळी हंगामात राजगिरा, पोकळा, माठ आणि मेथी यांसारख्या पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या भाज्या सहज उपलब्ध असून पोषणमूल्यांनी युक्त असतात. बाजारपेठ जवळ असल्यास व योग्य वाहतूक सुविधा असल्यास शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळतो. पालेभाज्यांसाठी नियमित पाण्याचा पुरवठा आणि योग्य व्यवस्थापन गरजेचे आहे.
Mumbai,Maharashtra
April 12, 2025 10:47 AM IST