Last Updated:
Agriculture News : भारत हा कृषिप्रधान देश असून, आजही देशातील मोठा हिस्सा शेतीवर अवलंबून आहे.पूर्वी शेती ही जोखमीची व अनिश्चित उत्पन्न देणारी मानली जात होती, मात्र आजच्या काळात काही दूरदृष्टी असलेल्या शेतकऱ्यांनी मेहनत, आधुनिक तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या जोरावर शेतीला एक यशस्वी आणि भरघोस नफा देणारा व्यवसाय बनवला आहे.
मुंबई : भारत हा कृषिप्रधान देश असून, आजही देशातील मोठा हिस्सा शेतीवर अवलंबून आहे. पूर्वी शेती ही जोखमीची व अनिश्चित उत्पन्न देणारी मानली जात होती, मात्र आजच्या काळात काही दूरदृष्टी असलेल्या शेतकऱ्यांनी मेहनत, आधुनिक तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या जोरावर शेतीला एक यशस्वी आणि भरघोस नफा देणारा व्यवसाय बनवला आहे. अशा पाच प्रेरणादायी शेतकऱ्यांच्या कथा आजच्या पिढीला शेतीकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्यास भाग पाडतात.
1) रामशरण वर्मा
उत्तर प्रदेशातील दौलतपूर गावातील रामशरण वर्मा यांनी फक्त 6 एकर वडिलोपार्जित जमिनीतून सुरुवात केली आणि आज त्यांच्या शेतीचे क्षेत्र 300 एकरांवर पोहोचले आहे. त्यांनी टोमॅटो, भेंडी आणि अन्य भाज्यांच्या लागवडीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत उत्पादन वाढवले. त्यांच्या यशाची दखल केंद्र सरकारने घेतली आणि 2019 मध्ये त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. आज त्यांची वार्षिक उलाढाल कोट्यवधींमध्ये आहे.
2) युवराज परिहार
आधुनिक व जैविक शेतीचा पुरस्कार करणारे युवराज परिहार हे बटाटा उत्पादनात आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहेत. त्यांना 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय बटाटा कॉन्क्लेव्हमध्ये ‘सर्वोत्कृष्ट उत्पादक’ म्हणून गौरवण्यात आले. त्यांनी डिजिटल शेती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आपली उलाढाल 50 कोटी रुपयांपर्यंत नेली आहे, जी भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चेचा विषय ठरली आहे.
3) प्रमोद गौतम
एकेकाळचे ऑटोमोबाईल इंजिनिअर असलेले प्रमोद गौतम यांनी 2006 मध्ये नोकरी सोडून शेतीत प्रवेश केला. सुरुवातीला नुकसान सहन करावे लागले, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी फळबागांची लागवड केली आणि डाळी प्रक्रिया यंत्रे बसवून शेती व्यवसायाचे रूपांतर व्यवसायिक यशात केले. त्यांच्या यशस्वी प्रवासातून हे स्पष्ट होते की, शाश्वत नियोजन व सातत्याने प्रयत्न केल्यास शेतीत कोणताही नवखाही यशस्वी होऊ शकतो.
4) सचिन काळे
कॉर्पोरेट क्षेत्रातील यशस्वी कारकीर्द सोडून शेतीत प्रवेश करणारे सचिन काळे यांनी “इनोव्हेटिव्ह अॅग्रीलाइफ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड” या कंपनीची स्थापना केली. कंत्राटी शेतीवर आधारित ही कंपनी इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करते. त्यांची वार्षिक उलाढाल सुमारे 2.5 कोटी रुपये असून त्यांनी शेतीला एक आधुनिक व्यावसायिक रूप दिले आहे.
5) डॉ. राजाराम त्रिपाठी
बिहारातील बस्तर जिल्ह्यातील डॉ. राजाराम त्रिपाठी यांची ओळख ‘हर्बल शेतीचे दिग्गज’ म्हणून आहे. ते पांढरी मुसळी व काळी मिरी यासारख्या औषधी पिकांची 1000 एकर क्षेत्रावर शेती करतात. त्यांनी माँ दंतेश्वरी हर्बल ग्रुप स्थापन केला असून युरोप आणि अमेरिकेतही निर्यात करतात. त्यांच्या शेती व्यवस्थापनात हेलिकॉप्टरसारखी सुविधा देखील आहे.आज त्यांची वार्षिक उलाढाल 25 कोटी रुपये आहे.
Mumbai,Maharashtra
शेतीतून कोटींचा टर्नओव्हर, फिरायला हेलिकॉप्टर! भारतातील 5 सर्वात श्रीमंत शेतकरी