Last Updated:
Agriculture News : महाराष्ट्रात खरीप हंगामात सोयाबीन हे प्रमुख आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे पीक मानले जाते. बदलत्या हवामानामुळे आणि जमिनीच्या गुणवत्तेमुळे अपेक्षित उत्पादनात चढ-उतार होत असतो.
मुंबई : महाराष्ट्रात खरीप हंगामात सोयाबीन हे प्रमुख आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे पीक मानले जाते. बदलत्या हवामानामुळे आणि जमिनीच्या गुणवत्तेमुळे अपेक्षित उत्पादनात चढ-उतार होत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीपूर्वी योग्य नियोजन आणि शास्त्रशुद्ध पद्धतींचा अवलंब केल्यास चांगले उत्पन्न मिळवणे शक्य आहे. सोयाबीनची लागवड सर्वसाधारणपणे सर्व प्रकारच्या जमिनीत होऊ शकते, परंतु काही बाबी लक्षात घेतल्यास उत्पादनात वाढ होऊ शकते.
1) योग्य जमीन निवड आणि हवामान
सोयाबीन लागवडीसाठी मध्यम ते भारी प्रकारची, सेंद्रिय घटकांनी समृद्ध अशी जमीन उपयुक्त ठरते. अती हलक्या, आम्लयुक्त, क्षारयुक्त किंवा रेताड जमिनीत सोयाबीनची पिके अपेक्षित उत्पादन देत नाहीत. त्यामुळे अशा जमिनी टाळाव्यात.
सोयाबीनची पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. मात्र पेरणीसाठी मान्सूनचा पहिला 100 मिमी पाऊस झालेला असावा, कारण पुरेसा ओलावा नसल्यास बीज अंकुरणार नाही आणि उत्पादन घटेल.
2) खोल नांगरणीचे महत्त्व
शेताच्या उत्पादनक्षमतेत सातत्य राहण्यासाठी 2-3 वर्षातून एकदा खोल नांगरणी करणे उपयुक्त आहे. जे शेतकरी मागील काही वर्षांपासून खोल नांगरणी करत नाहीत, त्यांनी यंदा हे काम नक्की करावे. यामुळे जमिनीत हवाचक्र सुधारते आणि मुळे खोलवर जातात, परिणामी उत्पादनात वाढ होते. नंतर कल्टिव्हेटरद्वारे विरुद्ध दिशेने दोनदा मशागत करून शेत तयार करावे.
3) सेंद्रिय खतांचा वापर
शेवटची मशागत करताना शेणखत किंवा कोंबडी खत मिसळावे. यामुळे जमिनीतील सूक्ष्म पोषकतत्त्वे वाढतात जमीन भुसभुशीत होते आणि पिकाची वाढ सुरळीत होते. सेंद्रिय खतामुळे रासायनिक खतांवरचा खर्चही कमी होतो.
4) सब-सॉयलरचा वापर
उपलब्धतेनुसार, सब-सॉयलर यंत्र 10 मीटर अंतरावर विरुद्ध दिशेने चालवावे. यामुळे जमिनीच्या खोल थरांमध्येही पाणी जिरते व साठते. अशा प्रकारे तयार केलेली जमीन दुष्काळसदृश परिस्थितीतही काही काळ पिकाला तग धरून ठेवण्यास मदत करते.
Mumbai,Maharashtra
June 04, 2025 11:39 AM IST