अक्षय तृतीया हा सण विशेषतः शुभ कार्यासाठी ओळखला जातो. या दिवशी अनेक घरांमध्ये आमरस-पुरी किंवा आमरस-पोळीचा खास बेत असतो. त्यामुळे आंब्याची मागणी अचानक वाढल्याने बाजारातही मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. मुंबईकरांमध्ये हापूस, केसर, बदामी, लालबाग आणि तोतापुरी आंब्याला विशेष पसंती मिळत आहे.
दरम्यान, विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार देवगड हापूसचा हंगाम पुढील चार दिवसांत संपण्याची शक्यता आहे. त्यानंतर रत्नागिरीतील हापूसची आवक 25 मेपर्यंत सुरू राहणार असून, रायगडचा हापूस 5 जूनपर्यंत बाजारात उपलब्ध होणार आहे. जुन्नरचा हापूस मात्र मे अखेरीसच बाजारात येईल, तर जून अखेरीस उत्तर प्रदेशमधील आंब्याचा हंगाम सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सध्या कोकणातील हापूस खरेदीसाठी ग्राहकांकडून घाई होताना दिसत आहे.
सध्याचे आंब्याचे बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत:
आंबा प्रकार घाऊक दर (रु.मध्ये) किरकोळ दर (रु.मध्ये)
हापूस (डझन) 300 ते 800 500 ते 1,300
बदामी (किलो) 40 ते 65 80 ते 125
लालबाग (किलो) 40 ते 50 80 ते 100
तोतापुरी (किलो) 30 ते 40 60 ते 70
केसर (किलो) 60 ते 100 100 ते 120
हापूस आंब्याला नेहमीप्रमाणे सर्वाधिक मागणी आहे. सध्या दर्जानुसार हापूसचे घाऊक दर डझनाला 300 ते 800 रुपये आहेत, तर किरकोळ बाजारात हा दर 500 ते 1,300 रुपयांपर्यंत पोहोचत आहे. केसर, बदामी, लालबाग आणि तोतापुरी या इतर प्रजातींचे दर तुलनेने कमी आहेत, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक देखील त्यांच्या आवडीनुसार खरेदी करत आहेत.
विशेष म्हणजे, हवामान अनुकूल राहिल्यामुळे यंदा आंब्याचे उत्पादन चांगले झाले आहे. त्यामुळे आगामी काही दिवस बाजारात आंब्याचा पुरवठा चांगल्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. विक्रेत्यांच्या मते, देवगड आणि रत्नागिरी हापूसचा दर्जा उच्च प्रतीचा असल्याने ग्राहकांचा कल या प्रकाराकडे अधिक आहे.
Mumbai,Maharashtra
April 29, 2025 11:07 AM IST
अक्षय तृतीयाच्या निमित्ताने आंबा खातोय ‘भाव’ कोणत्या आंब्याला किती मिळतोय दर? वाचा सविस्तर