Last Updated:
Agriculture News: शेतीला कायमस्वरूपी शाश्वत सिंचनाची सोय व्हावी म्हणून येथील एका शेतकऱ्याने चक्क दोन एकरात शेततळे उभारले आहे.
जालना: शेतीला कायमस्वरूपी शाश्वत सिंचनाची सोय व्हावी म्हणून येथील एका शेतकऱ्याने चक्क दोन एकरात शेततळे उभारले आहे. आश्चर्य म्हणजे, शासनाच्या कोणत्याच योजनेचा लाभ न घेता ही किमया करून दाखवली आहे. रावसाहेब ढगे असे या अवलिया शेतकऱ्याचे नाव आहे.
जालना तालुक्यातील सिरसवाडी येथील प्रयोगशील शेतकरी रावसाहेब ढगे यांची गावशिवारात साडेसात एकर जमीन आहे. त्यापैकी 2 एकरात 2 कोटी लिटर पाणी क्षमतेचे शेततळे त्यांनी उभारले आहे. दरम्यान, हे शेततळे जमिनीवर 25 फूट खाली 25 फूट असे एकूण 50 फूट खोलीचे आहे. तळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे जमिनीच्या खाली लागलेले पाणी अनेक पाईपद्वारे एकत्र करत विहिरीत सोडले आहे. खालील पाईपवर तीन फूट मातीचा थर लावून त्यावर प्लॅस्टिक पेपरचे अस्तरीकरण केले आहे.
दरम्यान, ढगे शेतीला कायमस्वरूपी सिंचनाची सोय असावी म्हणून हा निर्णय घेतला आहे. यांनी उर्वरित साडेपाच एकर जमिनीवर मोसंबी, आद्रक, सोयाबीन, कापूस आदी पिके घेतली आहेत. मागील 25 वर्षांपासून ते शेळीपालन व्यवसायही करत आहेत. कृषी विभागासह अनेक शासकीय अधिकारी त्यांचे शेतीतील प्रयोग पाहण्यासाठी येत असतात.
मला जसे शेततळे हवे होते तसेच करण्याची इच्छा होती. यासाठी शासनाची योजना न घेता बँकेचे कर्ज काढले, अर्धा एकर जमीन विकली, पाहुण्यांकडून काही पैसे उसने घेतले आणि हे तळे उभारले. 50 फूट खोलीचे हे जिल्ह्यातील एकमेव शेततळे आहे. या तळ्यात मोठ्या प्रमाणावर मत्स्यपालन करणार आहे. तसेच कृषी पर्यटनही उभारण्याचा मानस आहे.
Jalna,Maharashtra
July 08, 2025 6:00 PM IST
Agriculture News: 2 कोटी लिटर पाणी क्षमता, 50 फुट खोल, जालन्यातील शेतकऱ्याने बनवले चक्क 2 एकरात शेततळे