भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन ते पाच दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल. त्यामुळे राज्यभरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
कोकण-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा
मंगळवारी कोकण आणि घाटमाथा परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कमी दाबाचा प्रभाव कायम, राज्यभरात पावसाची शक्यता
मराठवाडा आणि आसपासच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र कायम असल्यामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. विशेषतः कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहील, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
विदर्भात देखील काही ठिकाणी पावसाचे पूर्वानुमान व्यक्त करण्यात आले आहे. तसेच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे, पुणे, सातारा आणि कोकणातील घाट परिसरात मंगळवारी अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे.
या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी
हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
तसेच अहिल्यानगर (नगर), सातारा, पुणे, कोल्हापूर या भागांमध्ये पुढील काही दिवस अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.
सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भासाठी पुढील पाच दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Mumbai,Maharashtra
शेतकऱ्यांनो मॉन्सून अॅक्शन मोडवर! पुढील 3 दिवस धोक्याचे, या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा