Last Updated:
सद्यस्थितीमध्ये अनेक शेतकरी टोकन यंत्राचा वापर करून पेरणी करीत आहेत. बियाणे टोकन यंत्र वापरून पेरणी केल्यास अनेक फायदे होतात, असं अनेक शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
अमरावती: पाऊस झाला की, शेतकऱ्यांची पेरणीची घाई सुरू होते. अनेक शेतकऱ्यांची पेरणी एका वेळी आली की, मजूर मिळत नाही. मजूर मिळाला नाही की, पेरणी लांबणीवर जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना काही वेळा नुकसानही सहन करावे लागते. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून सद्यस्थितीत अनेक शेतकरी टोकन यंत्राचा वापर करून पेरणी करत आहेत. बियाणे टोकन यंत्र वापरून पेरणी केल्यास अनेक फायदे होतात, असे अनेक शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. पाहुयात, टोकन यंत्राचा वापर करून पेरणी केल्यास कोणकोणते फायदे होतात.
अमरावती जिल्ह्यातील अनेक प्रगतशील शेतकरी यावर्षी टोकन यंत्राचा वापर करून पेरणी करत आहेत. त्यातीलच एका शेतकऱ्याशी लोकल 18 ने संवाद साधला. तेव्हा अंजनगाव बारी येथील शेतकरी रवींद्र मेटकर सांगतात की, बियाणे टोकन यंत्र हे आम्हा शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचे ठरत आहे. टोकन यंत्र वापरल्यास सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे बियाण्याची बचत होते. कारण या यंत्राच्या साहाय्याने पाहिजे तेवढे आणि पाहिजे तिथेच बी पडते. त्यामुळे बियाणे वाया जात नाही. त्याचबरोबर मजूर लावून जे बियाणे लागते त्यापेक्षा कमी बियाण्यात पेरणी होते.
उत्पन्नात वाढ होण्यास मदत
त्यानंतर दुसरा फायदा म्हणजे दोन झाडांतील अंतर सारखे करण्यासाठी मदत होते. या यंत्राद्वारे पेरणी करत असताना बियाणे सारख्या अंतरावर पडते. त्यामुळे पिकाला मोठे होण्यास पाहिजे तेवढी जागा शिल्लक राहते. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते आणि उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते.
मजुरीचा खर्च कमी
तिसरा फायदा म्हणजे मजुरीची बचत होते. ट्रॅक्टर किंवा मजुराच्या मदतीने पेरणी करायची म्हटले तर एक एकर शेतीला 700 रुपये खर्च येतो, तो पण फक्त मजुरीचा. या यंत्राच्या साहाय्याने 400 रुपयांत 3 एकर शेताची पेरणी आपण करू शकतो. एक व्यक्ती दिवसभरात 3 एकर शेतीची पेरणी करू शकतो. यंत्र हाताळण्यास देखील सोपे आहे. त्यामुळे कोणीही सहज या यंत्राद्वारे पेरणी करू शकतात, अशी माहिती शेतकरी रवींद्र मेटकर यांनी दिली.
Amravati,Maharashtra
June 25, 2025 4:45 PM IST
Kharif Season: शेतकऱ्यांनो, टोकन यंत्राचा वापर करून केलेली पेरणी वरदान, कोणकोणते होतात फायदे माहितीये का?