Last Updated:
Agriculture News : पाणी साचल्यास पिकांची मुळे कुजतात, झाडांचा वाढीवर परिणाम होतो आणि उत्पादनात घट येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना करून पाण्याचा निचरा सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
मुंबई : खरिप हंगाम हा मुख्यतः पावसाच्या पाण्यावर आधारित असतो. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत विविध पिके जसे की भात, मका, सोयाबीन, भुईमूग, तूर यांची लागवड केली जाते. या पिकांना योग्य प्रमाणात पाण्याची गरज असते, मात्र पावसाचे अतिप्रमाण किंवा सलग मुसळधार पाऊस झाल्यास शेतात पाणी साचण्याची समस्या निर्माण होते. पाणी साचल्यास पिकांची मुळे कुजतात, झाडांचा वाढीवर परिणाम होतो आणि उत्पादनात घट येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना करून पाण्याचा निचरा सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
1) शेतात निचऱ्याची योग्य व्यवस्था करणे
खरिप हंगाम सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी शेताची पाण्याचा निचरा होईल अशी रचना करणे गरजेचे आहे. शेताच्या कडेने आणि मधोमध लहान नाल्या किंवा गटार तयार केल्यास पावसाचे पाणी लवकर बाहेर काढता येते. यामुळे पाणी साचण्याचा धोका कमी होतो.
2) उंचवटा किंवा बेड पद्धतीची शेती
उंचवटा शेती म्हणजेच जमिनीवर थोडा उंच भाग करून त्यावर पिकांची लागवड करणे. यामुळे पावसाचे पाणी बाजूला वाहून जाते आणि पिकांच्या मुळांमध्ये पाणी साचत नाही. भाजीपाला, सोयाबीन, मका इत्यादी पिकांसाठी ही पद्धत विशेष उपयुक्त आहे.
3) जलनिचरा सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर
गांडूळ खत, कंपोस्ट खत यांसारख्या सेंद्रिय खतांचा वापर केल्यास माती सच्छिद्र होते. यामुळे मातीचे जलशोषण व निचरा क्षमता वाढते आणि पाणी साचण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे शेतात या खतांचा वापर करा
4) माती परीक्षण करून योग्य लागवड पद्धती निवडणे
मातीची जलधारण क्षमता लक्षात घेऊन लागवडीची पद्धत व पिके निवडावी. जर माती चिकट किंवा काळी असेल तर निचऱ्याची सोय अत्यंत महत्त्वाची असते.
5) शेताच्या आजूबाजूच्या गवताचे व्यवस्थापन
नाल्यांमध्ये गवत किंवा कचरा अडथळा ठरू शकतो. त्यामुळे वेळोवेळी नाल्यांची स्वच्छता करून पाण्याचा प्रवाह मोकळा ठेवणे आवश्यक आहे.
Mumbai,Maharashtra
पावसाळ्यात शेतात जास्त पाणी साचू नये यासाठी काय उपाययोजना कराव्यात? वाचा