बोगस बियाण्यांचा वाढता सुळसुळाट
खरिपात कापूस, भात, सोयाबीन, तूर, मका यांसारख्या पिकांसाठी मोठ्या प्रमाणावर बियाण्यांची मागणी असते. या मागणीचा फायदा घेत काही असामाजिक व्यापारी बोगस व अमान्य बियाण्यांची विक्री करत असतात. हे बियाणे अंकुरत नाहीत किंवा नंतर त्यांची वाढ खुंटते. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी नुकसान सहन करावं लागतं.
खते, कीटकनाशकांमध्येही फसवणूक
बियाण्यांप्रमाणेच खते आणि कीटकनाशकांच्या बाबतीतही बोगस उत्पादनांची विक्री वाढते. काहीवेळा ही उत्पादने बनावट असतात, तर कधी त्यांची कालबाह्यता संपलेली असते. अशा उत्पादनांचा पिकांवर काहीही परिणाम होत नाही किंवा उलट नुकसान होते.
शेतकऱ्यांनी खरेदीवेळी कोणती काळजी घ्यावी?
परवाना असलेल्या विक्रेत्यांकडूनच खरेदी करा
शेतकऱ्यांनी केवळ कृषी विभागाच्या परवानाधारक विक्रेत्यांकडूनच बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करावीत. स्थानिक बाजारात थेट विक्री करणाऱ्या अनोळखी लोकांपासून सावध राहावं.
बिल घ्यायलाच हवं
कोणतेही उत्पादन घेताना हमखास रोख किंवा डिजिटल पेमेंटचं रीतसर पावती (बिल) घ्या. हे बिल भविष्यात तक्रार करताना किंवा नुकसान भरपाईसाठी उपयुक्त ठरते.
लेबल व तपशील तपासा
बियाण्याच्या पिशवीवरची माहिती (जसे की उत्पादकाचे नाव, बॅच नंबर, उत्पादन व कालबाह्यता दिनांक, अंकुरणक्षमता इ.) नीट तपासा. बिनलेबली, छाप नसलेली पिशवी असलेल्या बियाण्यांपासून दूर राहा.
संपर्क क्रमांक, हेल्पलाइन लक्षात ठेवा
बोगस उत्पादनांचा संशय आल्यास लगेचच तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा
सरकारकडून कारवाई सुरु
दरम्यान, राज्य कृषी विभाग,पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभाग एकत्र येऊन बोगस बियाण्यांविरोधात संयुक्त कारवाई करत आहेत. अनेक ठिकाणी छापे टाकून बोगस साठे जप्त करण्यात आले आहेत.
Mumbai,Maharashtra
June 04, 2025 8:29 AM IST
बोगस बियाणे विक्रीचा सुळसुळाट वाढला! खरेदीवेळी शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी?