Last Updated:
Agriculture News : राज्यात यंदा मान्सूनपूर्व पाऊस अपेक्षेपेक्षा लवकर आणि अधिक प्रमाणात झाल्याने अनेक भागांत शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मुंबई : राज्यात यंदा मान्सूनपूर्व पाऊस अपेक्षेपेक्षा लवकर आणि अधिक प्रमाणात झाल्याने अनेक भागांत शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः ज्या भागांमध्ये अधिक पाऊस पडला आहे, तिथे जमिनीत खूप ओलावा निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना काही काळ पेरणी थांबवावी लागणार आहे. वापसा येईपर्यंत कोणतीही पेरणी करू नये, असा स्पष्ट सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
राज्यात यावर्षी मॉन्सून साधारणतः 11 दिवस आधी दाखल झाला आहे. यामुळे शेतीच्या हंगामाला सुरुवात लवकर होईल, अशी अपेक्षा असताना, प्रत्यक्षात पावसाचे प्रमाण अधिक झाल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. आता पर्यंत राज्यात सरासरी 140 मिमी मान्सूनपूर्व पाऊस झाला असून काही भागांत हे प्रमाण अधिक असून जमिनी सतत ओलसर राहिल्यामुळे पेरणीसाठी योग्य वापसा अद्याप निर्माण झालेला नाही.
पेरणीसाठी घाई करू नका
राज्यात अनेक शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. मात्र, कृषी विभागाचे संचालक नाईकवाडी यांनी स्पष्ट सांगितले की, “पावसाचे प्रमाण लक्षात घेता शेतकऱ्यांनी घाईने पेरणी करू नये. वापसा तयार झाल्यावरच योग्य वेळ साधून पेरणी करावी.
34 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, पंचनाम्याच्या सूचना
राज्यातील काही भागांत झालेल्या अवकाळी किंवा अतिपावसामुळे एकूण 34,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती देखील नाईकवाडी यांनी दिली. “नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि ते पूर्ण झाल्यावर अहवाल राज्य शासनाला सादर केला जाईल,” असे ते म्हणाले.
Mumbai,Maharashtra