Last Updated:
Agriculture News : महाराष्ट्रात सातबारा उताऱ्यांच्या संगणकीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र महसूल अधिनियमातील कलम 155 अंतर्गत बेकायदेशीररित्या दुरुस्ती आदेश दिल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
पुणे : महाराष्ट्रात सातबारा उताऱ्यांच्या संगणकीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र महसूल अधिनियमातील कलम 155 अंतर्गत बेकायदेशीररित्या दुरुस्ती आदेश दिल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यामुळे शासनाने आता राज्यभर अशा सर्व आदेशांची चौकशी करण्याचे निर्देश दिले असून, नियमबाह्य बदल करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार असल्याचा स्पष्ट इशारा जमाबंदी आयुक्तांनी दिला आहे.
पुणे विभागात उघड झाला मोठा प्रकार
सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करताना मूळ हस्तलिखित उताऱ्यातून अनेक महत्त्वाचे तपशील जसे की शेरे, क्षेत्रफळ, नावे, वारसनोंदी यामध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात आले होते. यामुळे पुणे विभागात 50,432 सातबारा उताऱ्यांपैकी तब्बल 44,941 उताऱ्यांमध्ये विसंगती आढळली.
महसूल अधिनियमातील कलम 155 हे फक्त चूक सुधारण्यासाठीच वापरायचे असताना, त्याचा आधार घेऊन अनेक अधिकाऱ्यांनी नामांतर, शेरे व शर्ती हटवण्याचे आदेश दिले. याविरोधात लोकप्रतिनिधी, शेतकरी आणि नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्यावरून पुणे विभागीय आयुक्त सौरव राव यांच्या नेतृत्वाखाली 5 जिल्ह्यांत (पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली) तपासणी आदेश देण्यात आले.
समित्यांची स्थापना आणि प्राथमिक निष्कर्ष
प्रत्येक जिल्ह्यात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात आल्या. त्यांनी मूळ हस्तलिखित सातबारा आणि संगणकीकृत सातबाऱ्यांची तंतोतंत तुलना केली. चौकशीत आढळले की, नवीन नोंदी घालताना अनेक ठिकाणी नियम डावलले गेले, आणि काही प्रकरणांमध्ये संशयास्पद व्यवहारही समोर आले.
कायदेशीर कारवाई होणार
भूमी अभिलेख विभागाने या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करत आता राज्यभर अशा आदेशांची फेर तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कलम 155 अंतर्गत दिले गेलेले सर्व आदेश तपासून नियमबाह्य असल्याचे सिद्ध झाल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
Mumbai,Maharashtra
June 13, 2025 2:25 PM IST