Last Updated:
Ajit Pawar On Farmers Loan : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं, असा थेट उलटसवाल केला. अजितदादांच्या या वक्तव्यावरून वाद रंगण्याची शक्यता आहे.
ज्ञानेश्वर साळोंखे, प्रतिनिधी, कोल्हापूर: महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वसनांची पूर्तता करण्याची मागणी आता सामान्यांकडून होत आहे. तर, दुसरीकडे महायुतीच्या मंत्र्यांकडून काही आश्वसनांबाबत सध्या यु-टर्न घेतल्याचे दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं, असा थेट उलटसवाल केला. अजितदादांच्या या वक्तव्यावरून वाद रंगण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी आपल्या रोखठोक शैलीत शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर उत्तर दिले. राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी, त्यानंतर आता भेडसावत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बाजारभावाच्या अस्थिरतेमुळे शेतकरी अडचणीत आहेत. त्यात कर्जमाफीसारख्या आश्वासनांची घोषणा होऊनही प्रत्यक्षात काहीच न मिळाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या वक्तव्यावर राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.
अजित पवारांनी काय म्हटले?
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. त्याबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्यावर अजित पवार यांनी उलट सवाल करत “शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं? मी दिलं आहे का? मी दिलं आहे का? मी तरी दिलं नाही!” अशा स्पष्ट आणि थेट शब्दांत अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली.
महायुतीच्या नेत्यांना आश्वासनांचा विसर?
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीची सत्ता आल्यास कर्जमाफी दिली जाईल, असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आले होते. त्याशिवाय लाडकी बहीण योजनेचे मानधन हे 1500 रुपयांहून 2100 रुपये करण्याची घोषणा महायुतीने केली होती. त्यानंतर महायुतीच्या मंत्र्यांकडून या घोषणेवर प्रश्न निर्माण केले. आता, अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीवर केलेल्या वक्तव्याने आता विरोधक आणखीच आक्रमक होण्याची शक्यता आहे.
Kolhapur,Maharashtra
May 02, 2025 12:57 PM IST