Last Updated:
Agriculture News : बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये लिचीचं पीक प्रचंड यशस्वी ठरलं असून, आता महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांनीही त्याचा स्वीकार केला आहे.
मुंबई : पारंपरिक पिकांवर अवलंबून असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आता लिची शेती नवा आशेचा किरण बनत आहे. बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये लिचीचं पीक प्रचंड यशस्वी ठरलं असून, आता महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांनीही त्याचा स्वीकार केला आहे. कमी खर्चात अधिक नफा देणाऱ्या या फळपिकामुळे अनेक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लाखोंची भर पडत आहे.
लिची शेतीची सुरुवात कशी करावी?
लिची (Litchi chinensis) हे एक उष्णकटिबंधीय फळ असून उष्ण व दमट हवामानात ते चांगले वाढते. महाराष्ट्रातील कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, विदर्भातील काही भाग यासाठी योग्य ठरू शकते.लिचीची शेती करण्यासाठी गाळयुक्त चिकणमातीची जमीन आणि भरपूर पाणी साठवण क्षमता असलेली जमीन उपयुक्त असते.
एक हेक्टर क्षेत्रात सुमारे 100 ते 120 लिची झाडं लावता येतात. झाडाला फलधारणा सुरू होण्यासाठी 4-5 वर्षे लागतात, मात्र एकदा सुरुवात झाल्यानंतर 20-25 वर्षे सातत्याने उत्पादन मिळते.
खर्च आणि उत्पन्न
प्रारंभिक टप्प्यात सिंचन व्यवस्था, रोपांची खरेदी, खतांची उपलब्धता यावर साधारणतः 1 ते 1.5 लाख रुपये प्रति एकर खर्च येतो. एक झाड सरासरी 30-50 किलो लिची उत्पादन देऊ शकते. 100 झाडांमधून दरवर्षी 3000-4000 किलो लिची सहज मिळू शकते. सध्या बाजारात लिचीचा दर 100 ते 250 रु प्रति किलो दरम्यान असतो. म्हणजेच 1 हेक्टरमधून 3 ते 10 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न सहज मिळू शकते.
लिचीच्या मागणीमध्ये वाढ
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात लिचीची मागणी दिवसेंदिवस वाढते आहे. खासकरून गुणवत्तापूर्ण, सेंद्रिय लिचीला परदेशी बाजारात चांगला भाव मिळतो. लिचीमध्ये व्हिटॅमिन C, अँटीऑक्सिडंट्स, मिनरल्स यांचं प्रमाण भरपूर असतं,त्यामुळे हे आरोग्यासाठी लाभदायक फळ म्हणूनही ओळखलं जातं.
लिची शेतीसाठी काही टिप्स
सेंद्रिय शेतीवर भर द्या.बाजारात अधिक भाव मिळतो. थेट मार्केटिंग किंवा ऑनलाईन विक्रीचा मार्ग स्वीकारा. शेतीसोबत मधमाशी पालन (Bee keeping) केल्यास लिचीचे परागीकरण वाढते आणि उत्पादनही अधिक मिळते. कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार सरकारी अनुदान योजनांचा लाभ घ्या.
Mumbai,Maharashtra
June 04, 2025 11:02 AM IST