महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास सध्या ठप्प झाला असून, आगामी काही दिवसांत पावसाची फारशी शक्यता नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, किमान 10 जूनपर्यंत मान्सूनचा प्रवास थांबलेला राहणार आहे. परिणामी, या दरम्यान राज्यातील बहुतांश भागात कोरडे हवामान राहील, तर काही भागांमध्ये केवळ हलक्या सरींची शक्यता आहे.
तापमानात वाढ, शेतकऱ्यांना इशारा
मान्सून रखडल्यामुळे राज्यात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भात पाऱ्याने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि खानदेशातही तापमान 35 ते 40 अंश दरम्यान राहणार आहे. या कोरड्या हवामानाचा शेतीच्या सुरुवातीच्या कामांवर परिणाम होण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
राज्यात अनेक भागांत शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली असली तरी हवामान स्थिती पाहता, कृषी विभागाने पेरणी व लागवडीस थोडा विलंब करण्याचा सल्ला दिला आहे. खोट्या किंवा अप्रामाणिक हवामान अंदाजांवर विश्वास ठेवू नये, असा इशाराही विभागाकडून देण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाची हलकी हजेरी
मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये 1 ते 4 जूनदरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
1 जून रोजी या भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे, तर 2 ते 4 जून दरम्यान, पावसाचा जोर थोडा वाढून मध्यम स्वरूपाचा राहू शकतो.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून, 2 ते 4 जूनदरम्यान या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या महत्त्वाच्या गोष्टींकडे असू द्या लक्ष…
राज्यभरात मान्सूनची गती सध्या मंदावली आहे. 10 जूनपर्यंत फारसा पाऊस होण्याची शक्यता नाही. तापमान वाढल्याने उष्णतेची लाट जाणवू शकते. शेतकऱ्यांनी पेरणीस घाई न करता, हवामान खात्याच्या अधिकृत अंदाजानुसारच निर्णय घ्यावा.
Mumbai,Maharashtra
June 01, 2025 2:45 PM IST