मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात काहीशी शांतता पाहायला मिळाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा हवामान सक्रिय झाले असून राज्यभरात पावसाने जोर धरायला सुरुवात केली आहे. यामुळे शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाला सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
कोकण विभागात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई आणि ठाणे भागातही ढगाळ हवामानासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्रात वारे आणि विजांचा कडकडाट
पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांत विजांच्या गडगडाटासह 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या भागातील नागरिकांनी उघड्यावर राहणे, जलाशयाजवळ जाणे किंवा विजा चमकत असताना झाडांखाली थांबणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
मराठवाड्यात सर्वत्र यलो अलर्ट
धाराशिव आणि लातूर वगळता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागातही पावसाचं वातावरण सक्रिय असून, शेतकऱ्यांनी आगामी शेती कामांसाठी हवामानाचा अंदाज घेऊन योग्य नियोजन करावं, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
विदर्भातही पावसाचा जोर
बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. या भागातही विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
12 जूननंतर पावसाचा जोर वाढणार
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 12 जूननंतर राज्यात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. मान्सून सध्या उत्तरेकडे सरकत असून, लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पूर्णपणे सक्रिय होईल आणि शेतीसाठी पोषक वातावरण निर्माण होईल.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
हवामान बदल लक्षात घेता पेरणीपूर्व मशागतीची तयारी सुरू ठेवावी. पुढील हवामानाच्या अंदाजावर आधारित शेतीचे नियोजन करावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने विजेपासून दूर राहावे व घराबाहेर जाण्याचे टाळावे.
Mumbai,Maharashtra
June 08, 2025 12:19 PM IST
सावधान! 40 किमी वेगाने वादळी वारे,अतिमुसळधार पाऊस,’या’ जिल्ह्यांना सर्वाधिक धोका