पाण्याचे वजन म्हणजे ट्रॅक्टरचा संतुलन
ट्रॅक्टरचा उपयोग करताना वजनाचे संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे असते. विशेषतः जेंव्हा ट्रॅक्टरवर नांगर, रोटाव्हेटर, हर्वेस्टर, फवारणी यंत्र किंवा इतर जड अवजारे जोडले जातात, तेंव्हा मागील टायरमध्ये अधिक भार पडतो. जर टायरमध्ये हवा कमी आणि वजन हलके असेल, तर ट्रॅक्टर स्लिप करू शकतो, म्हणजेच मातीवरून घसरू शकतो. पाणी भरल्यामुळे टायरचे वजन वाढते आणि ट्रॅक्टरला अधिक ग्रिप मिळते. यामुळे शेतीकाम करताना ट्रॅक्टर अधिक स्थिर राहतो आणि रेखांशावर सरळ काम करू शकतो.
जमिनीवर पकड (Traction) वाढवण्यासाठी उपयुक्त
शेतात काम करताना विशेषतः ओली किंवा मऊ जमिनीत ट्रॅक्टरचे चाक अधिक खोल घुसतात. अशावेळी जर चाक हलके असतील, तर ते फसण्याचा धोका वाढतो. पाण्यामुळे टायरमध्ये आवश्यक तेवढं वजन येतं आणि चाकांना अधिक मजबूत पकड मिळते. हे “ट्रॅक्शन” वाढवणं ही महत्त्वाची प्रक्रिया असून त्यामुळंच नांगरणी, सरीवाफा करणे, बियाणे पेरणी यांसारखी कामं नीट पार पडतात.
इंधन बचत आणि इंजिन क्षमतेचा योग्य उपयोग
पाण्याने भरलेले टायर ट्रॅक्टरला अधिक स्थिरता देतात, त्यामुळे ट्रॅक्टरला कमी वेळेत अधिक काम करता येते. याचा थेट परिणाम इंधन बचतीवर होतो. उदाहरणार्थ, जर ट्रॅक्टर घसरत नसेल, तर त्याचे इंजिन कमी परिश्रमात अधिक काम करू शकते. यामुळे डिझेलचा अपव्यय टाळता येतो आणि इंजिनचे आयुष्यही वाढते.
कमी खर्चात जास्त फायदा
पाणी हा एक सहज उपलब्ध आणि स्वस्त स्रोत आहे. टायरमध्ये पाणी भरणे ही प्रक्रिया खर्चिक नाही. बाजारात काहीजण टायरमध्ये “बॅलास्टिंग सोल्यूशन” (पाणी + नमक) वापरतात, जे थंडीच्या भागात गोठू नये यासाठी उपयोगी असते. परंतु महाराष्ट्रासारख्या उष्ण हवामानात केवळ पाण्याचा वापर पुरेसा ठरतो.
पाण्याचे प्रमाण किती भरावे?
सामान्यतः टायरच्या एकूण क्षमतेच्या सुमारे 70-75% भागात पाणी भरले जाते आणि वरचा भाग हवेने भरला जातो. त्यामुळे टायरमध्ये योग्य दाब टिकतो आणि झटपट बिघाड होण्याचा धोका कमी होतो.
दरम्यान, शेतीकामात ट्रॅक्टरच्या टायरमध्ये पाणी भरणे ही एक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर, कार्यक्षम आणि तांत्रिकदृष्ट्या उपयुक्त पद्धत आहे. यामुळे ट्रॅक्टरची पकड वाढते, इंधन वाचते, आणि शेतकऱ्याला शेतीकामात स्थिरता व गती मिळते. आधुनिक यंत्रशक्तीचा शहाणपणाने वापर केल्यास शेती अधिक परिणामकारक आणि फायदेशीर ठरू शकते.
Mumbai,Maharashtra
June 14, 2025 12:22 PM IST
ट्रॅक्टरच्या टायरमध्ये पाणी का भरले जाते? शेतीकामात कसा फायदा होतो? वाचा सविस्तर