मात्र, शहरीकरणामुळे अनेक ठिकाणी पूर्वी शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनींवर आता गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत. मोठ्या शहरांमध्ये जागेचा तुटवडा असल्यामुळे लोक लहान शहरांकडे वळत आहेत आणि तिथे शेतीची जमीन विकत घेऊन घर बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतीच्या जमिनीवर घर बांधण्याचे काही कायदेशीर नियम आहेत, जे पाळणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा, नंतर तुमचे बांधलेले घर तोडावे लागण्याची वेळ येऊ शकते.
शेतीच्या जमिनीवर थेट घर बांधता येते का?
जर तुमची जमीन कृषी उपयोगासाठी आरक्षित असेल, तर तुम्ही त्यावर थेट घर बांधू शकत नाही. त्यासाठी त्या जमिनीचे ‘नॉन-अग्रीकल्चरल’ (NA) मध्ये रूपांतर करणे आवश्यक असते. NA प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय घरबांधणीस परवानगी दिली जात नाही.
NA प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे:
जमीन मालकाचे ओळखपत्र
मालकी हक्काचे कागदपत्र (7/12 उतारा, फेरफार नोंद इ.)
भाडेपट्टा अथवा जमीन वापर करार
जर जमीन भेट म्हणून मिळाली असेल, तर भेट करार, विभाजन करार
ग्रामपंचायत किंवा नगरपरिषदेची एनओसी (No Objection Certificate)
सर्वेक्षण नकाशा आणि जमीन वापर योजनेची माहिती
जमीन महसूल पावत्या
जमीन कोणत्याही वादात नसावी किंवा देणी नसावीत
हे सर्व कागदपत्रे पूर्ण केल्यानंतरच जमीन NA मध्ये रूपांतरित केली जाऊ शकते.
शासनाचा नवा निर्णय काय सांगतो?
महाराष्ट्र सरकारने 2023 मध्ये या प्रक्रियेस अधिक पारदर्शक बनवण्यासाठी एक नवीन शासन निर्णय (GR) जारी केला आहे. याअंतर्गत बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम (BPMS) सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे बिगर कृषी उपयोग प्रमाणपत्र, तसेच बांधकाम आणि विकास परवानग्या ऑनलाइन पद्धतीने दिल्या जातील.
थोडक्यात काय तर शेतीच्या जमिनीवर घर बांधण्याआधी, ती जमीन कायदेशीररीत्या NA मध्ये रूपांतरित करणे आवश्यक आहे. शासनाच्या नव्या प्रणालीचा लाभ घेऊन, नियमांचे पालन करूनच पुढे पावले टाकावीत. अन्यथा, तुमचे घर कायद्याच्या चौकटीत बसत नसेल तर कारवाईला सामोरे जावे लागेल.
Mumbai,Maharashtra
शेतात टुमदार घर, बंगला बांधत असाल तर थांबा! आधी नियम समजून घ्या, अन्यथा होईल कारवाई